मुंबई – भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे नाह्मीच माध्यमांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. महाविकास आघाडी सरकारच्या संबंधित विविध नेत्यांवर गंभीर आरोप ते नेहमीच करत असतात. शिवसेनेमुळे खासदारकीचे तिकीट कापल्यानंतर आक्रमक झालेले सोमय्या शिवसेनेसाठी गेल्या काही दिवसांपासून मोठी डोकेदुखी ठरत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहनमंत्री अनिल परब,खा. संजय राऊत, प्रताप सरनाईक,रवींद्र वायकर या सारख्या अनेक सेना नेत्यांच्या मागे किरीट सोमय्या हात धुवून मागे लागल्याचे दिसून येते. सोमय्या यांच्या रडारवर आता कोणता नेता असणार याबाबत सर्वसामान्याच नव्हे तर राजकीय नेते देखील आपसात चर्चा करत असतात. मुद्देसूद आणि पुराव्यांच्या आधारे बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या सोमाय्यांच्या रडारवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आले आहेत.
सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत मिलिंद नार्वेकर यांनी दापोली येथे १० कोटींचा बेकायदेशीर बंगला बांधल्याचं आरोप केला. तसंच, यासंदर्भात मंत्रालयात जाऊन मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे तक्रार दिली. तसंच, दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय पर्यावरण सचिवांना तक्रार दिली, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिलिंद नार्वेकरांनी दापोली-मुरूड किनाऱ्यावर अनिल परब यांच्या घरापासून काही फुटाच्या अंतरावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. या बंगल्यासाठी समुद्र किनाऱ्यावरील साडेचारशे झाडं कापली. आज त्या जागेची किंमत १० कोटी आहे, दोन मजली बंगल्याचं बांधकाम सुरू आहे असा दावा सोमय्या करतात. या बांधकामाला मार्गदर्शन पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरेंचेच असावे असा देखील आरोप आता होऊ लागला आहे.
दरम्यान, सोमय्या हे विविध आरोप करत असताना ढीगभर पुरावे घेवून माध्यमांच्या समोर येतात तसेच संबंधित तपास यंत्रणांना देखील ते उपलब्ध करू देतात त्यामुळे सोमय्या हे अधिकच घातक ठरतात. सचिन वाझे, अनिल देशमुख,परमबीर सिंग या तिघांनादेखील अडचणीत आणण्यात सोमय्या यांचादेखील मोठा रोल आहे. शिवसेनेच्या जवळपास सर्वच शीर्षस्थ नेत्यांना सोमय्या यांनी आपला इंगा दाखवून दिला आहे. त्यामुळे आता नार्वेकरांना देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नार्वेकर यांचे ठाकरे परिवाराशी असणारे संबंध सर्वश्रुत आहेत त्यामुळे नार्वेकर अडचणीत आले तर ठाकरे हे सुद्धा अडचणीत येवू शकतात असा तर्क लावून सोमय्या हे नार्वेकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- कालचा ठराव आणि आजचा छापा हा राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न?
- भाजपचे सर्व नेते धुतल्या तांदळाचे, EDची पिडा फक्त विरोधकांच्या मागेच का ?
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

