मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांविषयी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे. तसेच यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया सुरु असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘केंद्रीय तपास यंत्रणांचे एक बडे अधिकारी भेटले. त्यांना विचारले, ”नक्की काय सुरू आहे?” त्यावर ते एका शब्दांत म्हणाले, ”आम्ही ‘टार्गेट’वर काम करतोय.” याचा अर्थ सरळ आहे. यंत्रणांचे राजकीय ‘बॉस’ जे टार्गेट देतील त्यानुसार कारवाया होत आहेत. मी त्यांना विचारले, ”उद्या सरकार बदलले तर कसे कराल?” यावर ते म्हणाले, ‘नवे सरकार सांगेल तसे काम करू. त्यांना हवे ते करू.’ याचा अर्थ स्पष्ट आहे. तो समजून घ्यायचा आहे. मुंबई-महाराष्ट्रात पैसा आहे. त्यामुळे येथे प्रत्येक केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्याला काम करायचे आहे. अशा अधिकाऱ्यांसाठी जो दिल्लीत रदबदली करेल तो अधिकारी त्या नेत्याचे हुकूम ऐकेल. सध्या तेच सुरू आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मुंबईतील एक पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे अंगडियांकडून खंडणी उकळण्याच्या प्रकरणात फरारी आहेत. ते थेट आयपीएस दर्जाचे अधिकारी आहेत. अशा खंडणीखोरीची अनेक प्रकरणे पुढच्या काळात बाहेर येतील. तामीळनाडूचे एक राजकीय नेते टी. व्ही. दिवाकरन यांना ‘ईडी’ने मनी लॉण्डरिंग प्रकरणात समन्स पाठवले. सुकेश चंद्रशेखर या ठगाला ईडीने आधीच पकडले व त्यातून अनेक गौप्यस्फोट झाले. सुकेश चंद्रशेखरशी संबंध असल्याचा ठपका ठेवून दिवाकरनवर कारवाई झाली, पण या सुकेश चंद्रशेखरकडून जे अनेक लाभार्थी ठरले त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी होते व त्यातील सगळ्यात मोठ्या लाभार्थ्याने ‘ईडी’तून राजीनामा देऊन उत्तर प्रदेशात भाजपची आमदारकी मिळवली. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विशेष एसआयटी नेमून तपासायला हवे. प्रमुख न्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली ती अशा प्रकरणांमुळे’, असेही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आजचे सत्ताधारी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- …हा विषय राज्य सरकारच्या तपास यंत्रणांनी अर्धवट सोडता कामा नये- संजय राऊत
- “हल्ला करायचाच होता तर ‘मातोश्री’वर…”, दिलीप मोहितेंचे मोठे वक्तव्य
- “बळकावलेल्या जमिनी बाहेर काढल्या म्हणून सदावर्तेंना अटक’; जयश्री पाटील यांचा आरोप


