औरंगाबाद:- मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.
महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.
काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे. तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आगपाखड केली होती.
दरम्यान, आज शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी औरंगाबादच्या नामांतरावरुन ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. तसेच केवळ सामना वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर संभाजीनगर लिहून नाव बदलत नाही, तर सरकारने नोटिफिकेशन काढावं, असं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेना या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचा आणि लोकांचा बळी घेत असल्याचाही आरोप केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सातारा : ‘…अन्यथा भाजपला कायदा हातात घ्यायला लागेल’
- ऍपल आणि हुंदाई एकत्र करणार ई-वाहन निर्मिती
- सातारा : फलक फाडला ही घटना दुर्दैवी; शिवभक्तांनी शांतता राखावी – शंभूराज देसाई
- ‘भंडारा घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबांना दहा लाखांची मदत दया’
- उदयनराजेंनी काल उदघाटन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा फलक अज्ञातांनी फाडला


