मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
या करीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल.
परंतु रिक्षा परवाना धारकांना सानुग्रह अनुदान मिळवण्यासाठी शासनाच्या काही नियमांची पूर्तता करावी लागणार आहे. हे अनुदान प्राप्त करण्यासाठी रिक्षा परवाना धारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे.त्यासाठी ‘सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल.’ असे आवाहन परिवहन मंत्री, ॲड. श्री. परब यांनी केले. सदर प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
- सुशांतच्या बायोपिकवर बंदीसाठी वडील हायकोर्टात मागणी, निर्मात्यांना नोटीस
- योगी सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा, हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती
- नागपूरसाठी १० हजार रेमडेसिवीर पाठवा, हायकोर्टाचे ठाकरे सरकारला आदेश
- कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना क्वॉरन्टाइन करा, एमआयएमची मागणी
- ‘महाविकास आघाडी नव्हे, हे तर महाकन्फ्यूज सरकार’, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल


