अहमदनगर: रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप देवरे यांनी पिंपळनेर येथे आदिवासी दलित बहुजन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवलेंनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना आठवले यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
भाजपला आव्हान दिलं तर तुमचा सुपडा साफ होईल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. चार राज्यातील जनतेनं भाजपच्या बाजुने कौल दिला आहे. त्यामुळे 2024 ला महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार आहे. शिवसेनेने अजूनही भाजपसोबत यावे, असा सल्लाही आठवले यांनी यावेळी दिला आहे. तर पुढे ते असेही म्हणाले कि, काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट बनली आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढेल असे दिसत नाही. त्यातच पक्षांतर्गत वाद देखील सुरु आहेत. गांधी परिवाराचं आकर्षण आता संपलंय. त्यामुळे काँग्रेसनं गांधी परिवार सोडण्याची गरज असल्याचा सल्लाही आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे.
“सातबाऱ्यावर आदिवासींच्या मालकी हक्काची नोंद करू…”- रामदास आठवले
यावेळी बोलताना आठवले असेही म्हणाले कि, धुळे, नंदुरबार यासह राज्यातील आदिवासीच्या ताब्यातील जमिनीचे वनहक्क दावे मंजूर करून आणि सातबाऱ्यावर आदिवासींची मालकी हक्काची नोंद करून, सातबारा आदिवासींना मिळवून देणार आहोत. तसेच येत्या काळात आदिवासी मुलांच्या कुपोषणासह आरोग्य, शैक्षणिक आणि रोजगार विषयक अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे वन विभाग, आदिवासी मंत्रालय, राज्य सरकारचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन देखील रामदास आठवले यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:


