मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा रद्द करण्यात आला आहे, मनसे कार्यकर्त्यांमध्ये वर्धापन दिनाचा उत्साह आहे, दरवर्षी मनसेचा वर्धापन दिन सोहळा राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होतो, परंतु यंदा कोरोनामुळे राज ठाकरेंचे भाषण होऊ शकणार नाही, अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा पाठवत आहेत, अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कार्यकर्त्यांना ऑडिओच्या माध्यमातून संदेश पाठवला आहे.
कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले कि, ‘आज आपल्या पक्षाचा १५ वा वर्धापन दिन, त्याबद्दल तुम्हा सर्वांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा… पण सगळ्यांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नाला आज पंधरा वर्षे पूर्ण झाली, पंधरा वर्षापूर्वी एका ध्येयाने बाहेर पडून जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हा खरंच सांगतो मनात एक धाकधूक होती, महाराष्ट्रासाठी काहीतरी नवं करण्यासाठी धडपड तुम्ही सगळे कसे स्वीकारणार, लोक कसे स्वीकारतील अशी धाकधूक होती. पण १९ मार्च २००६ च्या पक्ष स्थापनेनंतरच्या शिवतिर्थावरील पहिल्या सभेत मी व्यासपीठावर पाऊल ठेवलं, समोर पसरलेला जनसमुदाय पाहिला आणि मनातील शंका दूर झाली.
कोणालाही हेवा वाटेल अशी महाराष्ट्र सैनिकांची अफाट आणि अचाट शक्ती होती, या शक्तीचा माझ्यावर विश्वास आहे याची मला खात्री पटली. गेल्या पंधरा वर्षात कितीही संकट, खचखळगे आले तरी माझी महाराष्ट्र सैनिक रुपी संपत्ती माझ्यासोबत टिकून आहे. अडचणींचा डोंगर उभा राहिला तरी ती माझ्यासोबत आहे याच्या इतका आनंद दुसरा काय…आपल्यातील काहीजण सोडून गेले, त्यांचा निर्णय त्यांना लखलाभ. पण तुम्ही सह्याद्रीच्या कड्यासारखे माझ्यासोबत आहात. मी तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि पक्षाला जे जे यश भविष्यात मिळेल त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. तुमच्या हातून जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्याचा माझं तुम्हाला वचन आहे.
माझ्या तमाम बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…#मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक #राजसंवादhttps://t.co/bXKqZQyuqg
— Raj Thackeray (@RajThackeray) March 9, 2021
मी मनापासून सांगतो, की तुम्ही जे पंधरा वर्षात करून दाखवलं आहे ते अचाट आहे, राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःची नोकरी-व्यवसाय सांभाळून तुम्ही समाजकारणात आणि राजकारणात स्वतःच्या पद्धतीने जे काही केलं ते खरंच कौतुकास्पद आहे आणि हे सगळं कशासाठी तर आपल्या भाषेसाठी आपल्या मराठी माणसांच्या हितासाठी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि स्वधर्म रक्षणासाठी… या सगळ्यासाठी तुमच्या बद्दल माझ्या मनात कृतज्ञता तर आहेच आणि ती आयुष्यभर राहील पण मी खात्रीने सांगतो की, महाराष्ट्राच्या मनात देखील तुमच्याबद्दल कृतज्ञतेची भावना सदैव राहील.
तुमच्या घरच्यांनी देखील खूप केलं खूप सोसलं मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना देखील सांगू इच्छितो की, आपला प्रवास खडतर आहे पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या शुभेच्छांमुळे आणि आशीर्वादामुळे आमच्या पंखात आली आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही सगळे आव्हान सहज म्हणून पुढे जाऊ… बाकी कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा पहिलाच वर्धापन दिन आहे जेव्हा आपण भेटू शकत नाही. मला कल्पना आहे तुम्ही मला भेटायला आतुर असाल, मी आहे.
पण सध्याची परिस्थिती पाहता गर्दी टाळणं आवश्यक आहे. हे तुम्हीही मान्य कराल, तुम्हाला समोर पाहता येणार नाही, प्रत्यक्ष भेटता येणार नाही आणि म्हणूनच हा रेकॉर्ड संदेशाचा मार्ग स्वीकारला आहे. पण ही परिस्थिती संपल्यानंतर आपण भेटणार आहोत हे नक्की…ते देखील मोठ्या संख्येत… तोपर्यंत स्वतःची, स्वतःच्या कुटुंबीयांची तसेच आपल्या विभागातील नागरिकांची काळजी घ्या. वर्धापन दिनाच्या निमित्ताने १४ मार्चपासून आपण पक्षाची सदस्य नोंदणी पुन्हा एकदा सुरू करत आहोत.
सदस्य नोंदणी म्हणजे एका अर्थाने महाराष्ट्राला दिलेलं आश्वासन, वचन आणि व्यक्त केली बांधिलकी…याबाबतचा फॉर्म कसा भरायचा याची चित्रफित आपल्या सर्वांच्या हातात पोहोचेलच त्यातल्या सूचना समजून घ्या, समजावून सांगा महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या या मंगल कार्यात सर्वांना सामावून घ्या तुम्हाला पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा.’ अशा प्रकारच्या भावना त्यांनी त्यांच्या ऑडिओ संदेशातून व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- स्केटिंग करताना पडल्यानंतर जेनेलियाने सांगितली ‘मेरी रिकव्हरी पावरी स्टोरी’
- पेट्रोल-डिझेल ७५ रुपयांवर येणार? अनुराग ठाकुर यांनी राज्यसभेत दिलं उत्तर
- ‘बाबासाहेब आंबेडकरांची माणसाला माणसाशी जोडणारी नीती होती, तोडणारी नाही’
- मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, मात्र… बीएमसी आयुक्तांचं महत्वाचं विधान
- सैराट फेम परश्याचा कुस्ती खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

