नवी दिल्ली : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यासह अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यावेळी पुन्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. घराचा पत्ता कल्याण मार्ग असा ठेवल्याने कोणाचाही फायदा होत नाही, असा राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे.
सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवर 2021-22 साठी 8.1 टक्के व्याजदर मंजूर केला आहे, जो सेवानिवृत्ती निधी संस्थेच्या सुमारे पाच कोटी सदस्यांसाठी चार दशकांतील सर्वात कमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) वित्त गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी महागाईसाठी थेट केंद्र सरकारला जबाबदार धरले. “घराचा पत्ता ‘लोक कल्याण मार्ग’ ठेवल्याने लोकांचा फायदा होत नाही. साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांचे वर्तमान आणि भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पंतप्रधानांनी ‘महागाई वाढवा, कमाई कमी करा’ हे मॉडेल लागू केले आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरबाबत केंद्रातील मोदी सरकारला घेरले होते. “बँक मॅनेजर, शिक्षक आणि अनेक निरपराध लोकांचा दररोज बळी जात आहे, काश्मिरी पंडित स्थलांतर करत आहेत”, असे ट्विट त्यांनी केले होते. “ज्यांना त्यांचे संरक्षण करायचे आहे, त्यांच्याकडे चित्रपटाच्या प्रमोशनपासून वेळ नाही. भाजपने काश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनवले आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने पावले उचला, पंतप्रधान जी,” असे राहुल गांधी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

