मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने घातलेल्या निर्बंधातून काही प्रमाणात जालना जिल्ह्याला सूट मिळाली असली तरी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेत दररोज अडीच हजारापर्यंत कोरोनाच्या चाचण्या होतील, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जालना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना टोपे बोलत होते.
पालकमंत्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, यादृष्टीने नियोजन करत चाचण्याची संख्या दररोज अडीच हजारापर्यंत वाढविण्याबरोबरच लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात याव्यात. जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर सध्या कमी असला तरी हा दर भविष्यात वाढू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे ते म्हणाले.
कोविड निर्देशाप्रमाणे मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना करत कोविडमुळे रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क, सुरक्षित अंतराचे पालन याबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे.
जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये, यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अधिक दक्षपणे जनजगृती करण्यात यावी. दैनंदिन लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवत लसीकरणाची गती वाढविण्याच्या सूचनाही टोपे यांनी यावेळी दिल्या. जिल्हा मुख्यालयाबरोबरच तालुका स्तरावर आरोग्य सक्षमीकरण कारणावर भर देण्यात येत असून अंबड व घनसावंगी येथील 100 खाटांच्या रूग्णालयाच्या उभारणीचे नियोजन करण्याबरोबरच सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल परीक्षण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही टोपे यांनी यावेळी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्वाचा असला तरी मानवाचा जीवसुध्दा महत्वाचाच’
- ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- पुणे जिंकणार, कोरोना हरणार! आज नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
- अफगाणिस्तानवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

