पुणे : कोरोना महामारीच्या प्रभावामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. सुरुवातीला युजीसी आणि राज्य सरकारमधील परीक्षा घेण्यावरून झालेल्या संभ्रमानंतर अखेर अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे नियोजन राज्यातील विद्यापीठ करत आहेत. मात्र, आधीच परीक्षा घेण्यास झालेला विलंब व भविष्यातील अनिश्चिततेमुळं विद्यार्थी तणावात असतानाच विद्यापीठाच्या हलगर्जीपणाचा विद्यार्थ्यांना सामना करावा लागत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा १२ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. त्या ऑनलाइन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पार पडणार असून विद्यार्थ्यांनी निवडलेल्या प्रकारे परीक्षा देता येणार आहे. ऑनलाइन परीक्षांसाठी सुरुवातीला प्रश्नसंच देण्यात येईल असं वृत्त पसरलं होत, तशी घोषणा देखील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र, विद्यापीठाने व महाविद्यालयाने प्रश्नसंच देण्यास असमर्थता दर्शवली. विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षांची पूर्व तयारी म्हणून ऑनलाइन सराव चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे.
या परीक्षांसाठी एका खाजगी कंपनीला कंत्राट देखील देण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देतानाच विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा सामना करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सराव परीक्षा देण्याआधी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी तासंतास वाट बघून देखील अडचणी येत आहेत. काहींना तर विद्यापीठाने पुरवलेला गुप्तक्रमांक(पासवर्ड) वा ओळखपत्रच चुकीचा असल्याचा संदेश येत असल्याने विद्यार्थी भांबावत आहेत. त्यामुळे, सर्व काही सुरळीत व व्यवस्थित होईल असा दावा करणाऱ्या पुणे विद्यापीठाचाच पोकळ वासा निघत असेल तर इतर जिल्ह्यातील विद्यापीठांची परिस्थिती कशी असणार याचा विचार न केलेलाच बरा.
काही विद्यार्थ्यांनी दाद कोणाकडे मागणार अशी हतबलता व्यक्त करतानाच वर्षानुवर्षे एक निकाल वेळेवर संकेतस्थळावर उपलब्ध न करू शकणारं विद्यापीठ परीक्षांच्या तोंडावर असा अनागोंदी कारभार करत असेल तर त्यात नवल काय? अशी प्रतिक्रिया देखील देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
- शरद पवार व निलेश लंके यांच्या दिल्ली वारीला यश; के.के.रेंजसाठी भूसंपादन होणार नाही!
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेला महाराष्ट्र बंद मागे
- नाथाभाऊंनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही; चंद्रकांत पाटलांची भावनिक साद
- ‘प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजेंबद्दल अनुद्गार काढणे योग्य नाही’
- महाराष्ट्राने उदयनराजेंचा अपमान सहन केला याचं आश्चर्य वाटतं : निलेश राणे


