🕒 1 min read
औरंगाबाद : भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे हे अनेक वर्षे पाथरी तालुक्यातील भगवानगड येथे दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांना मानणारा बीड जिल्ह्यातला वंजारी समाज मोठ्या संख्येने त्याला उपस्थित असायचा. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीमध्ये गोपीनाथगड नावाचे स्थळ उभारण्यात आले. त्यानंतर भगवान गडाचे सध्याचे महंत नामदेव महाराज शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. तो वाद शमला असे पंकजा मुंडे दाखवत असल्या तरी महाराजांनी मात्र त्यांच्याविरोधातील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे.
नुकतीच नामदेव महाराज शास्त्री यांनी ‘दिव्य मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्याविरोधातील नाराजी आणि वादाचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, पंकजा यांना वाटते की वडील गोपीनाथ मुंडे यांनी गडाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून वैभव प्राप्त करून दिले. प्रत्यक्षात असे काहीही नाही. अर्थात गोपीनाथ मुंडे यांनीच मला गडाच्या गादीवर बसवले हेसुद्धा खरे आहे. पण पंकजा यांना दसऱ्यानिमित्त भाषण करण्याचा मालकी हक्क हवा होता. त्यांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशी बिरुदावली मिळाली होती. प्रत्यक्षात त्यांची जनतेशी असलेली नाळ तुटत गेली होती.
मला आश्चर्य वाटले की, भाषणातून त्यांनी थेट भगवान गडालाच आव्हान दिले. त्यांनी गडाला डिवचले. पंकजा यांनी जनतेची कामे करणेही बंद केले होते. पंकजा यांना मी गडावरून राजकीय भाषण करू दिले नाही. म्हणून त्यांचा माझ्यावर राग आहे. त्यांच्या पराभवात माझा काहीही वाटा नाही. देवेंद्र फडणवीस यांनी फूस दिली म्हणून मी त्यांना पराभूत करण्याचे समाजाला आवाहन केले, हे साफ खोटे आहे. पंकजांना गडावरून भाषणबंदी केली तर ४०० गावांमधून एकही जण मला जाब विचारायला आला नाही. उलट मी गडाला राजकारणापासून दूर ठेवल्यामुळे समाजाने माझे स्वागतच केले. पंकजाच नव्हे यापुढे कुणीही राजकारणी येथे येऊन भाषणबाजी करणार नाही. याची मी काळजी घेत आहे. समाजालाही ते आवडत असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.
२०१६ साली गडाचे उत्तराधिकारी नामदेवशास्त्री यांनी गडावर दसरा मेळावा होणार नाही अशी भूमिका घेतली आणि परवानगी नाकारली. त्यानंतर या दोघांनीही आपल्यामध्ये वाद नाहीत असे आपापल्या बाजूने सांगितले होते. मात्र, त्यानंतरही त्यांची एकमेकांना दिलेली उत्तरे-प्रत्युत्तरे चांगलीच गाजली होती. आता नामदेव शास्त्री यांनी केलेल्या या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया काय असेल याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना आणि लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुख्यमंत्र्यासोबत बैठक
- धक्कादायक! माजलगावातील कोवीड सेंटरमधील कोरोना रुग्णांनी ठोकली धूम
- खराब कामगिरीनंतरही के. एल. राहुलचा केला कोहलीने बचाव
- ‘अतिरेकी संघटनांना रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त केल्याशिवाय जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपणार नाही’
- कर्णधार कोहलीच्या ‘या’ निर्णयावर लक्ष्मणची नाराजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
