🕒 1 min read
मुंबई : जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सुनील गावसकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकापेक्षा एक सरस खेळी खेळल्या आहेत. पदार्पणाच्या पहिल्याच मालिकेत ७०० धावा करणाऱ्या या फलंदाजाच्या नावावर कसोटीत सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम आहे. गावसकर यांना कसोटीतील त्यांच्या खेळीचा अभिमान असेल, पण एकदिवसीयमध्ये अशी एक खेळी होती जी त्यांच्या कारकिर्दीतील लाजिरवाणी खेळी ठरली होती. आजचा म्हणजे ७ जूनचा दिवस त्यांच्यासाठी चांगला गेला नव्हता, कारण याच दिवशी त्याच्या नावावर एका लाजिरवाण्या खेळीची नोंद झाली होती. या केळीमध्ये ते नाबाद राहिले होते.
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक बरोबर ४६ वर्षांपूर्वी म्हणजे ७ जून १९७५ पासून सुरू झाला होता. या स्पर्धेत भारताचा संघही सहभागी झाला होता. भारताने विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर यजमान इंग्लंडचा सामना केला. या सामन्यात डेनिस एमिसच्या १३७ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ६० षटकात ३४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी सुनील गावसकर आणि एकनाथ सोलकर सलामीला आले होते. दोघांनी भारताला एकदमच संथ सुरुवात करून दिली. मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येचा पाठलाग करण्यासाठी भारताला वेगवान सुरुवात हवी होती.
त्यामुळे फलंदाजी करताना भारताने ६० षटकात ३ गडी गमावून एकूण १३२ धावा केल्या. ज्यात सर्वाधिक धावा गुंडप्पा विश्वनाथने ५९ चेंडूत ३७ धावा केल्या होत्या. भारतीय संघ हा सामना २०२ धावांच्या फरकाने हरला होता. या सामन्यातील सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे १७४ चेंडू खेळूनही सुनील गावसकर यांनी केवळ ३६ धावा केल्या आणि संपूर्ण डावात ते बादही झाले नव्हते. या डावात त्यांनी एकच चौकार लगावला होता. त्यांचा स्ट्राइकरेट २०.६९ होता. ही एकदिवसीय क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वात संथ खेळी होती.
महत्वाच्या बातम्या:

