मुंबई : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राज्यसभेचे खासदार शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट झाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा झाली.
पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींनी संवाद साधला. या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात असून १ तासाच्या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रातील चर्चेसोबतच महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील वाढलेला तणाव आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सातत्याची गैरसमज करणारी विधाने यामुळे सरकारबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
अशातच, राज्यासह केंद्रातील भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. तर, पवार-मोदी भेटीमुळे उत्सुकता अधिक वाढली आहे. दरम्यान, या भेटीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच जाण्याबाबत सूचक विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापनाच मुळात काँग्रेस विरोधात झाली होती. पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना करताना सोनिया गांधींबाबत आजपर्यंत जेवढं कोणी विरोधी भाष्य केलं नसेल तेवढी टीका केली होती. २०१४ पासून भाजप सत्तेत आल्यापासून काँग्रेस विरोधी पक्षांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे. काँग्रेस पासून देशाला वाचवायचं हेच आमचे प्रयत्न आहेत, असं भाष्य मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना केलं आहे.
पटोले आणि पवार यांच्यात गेल्या काही दिवसांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे काँग्रेस विरोधात जाऊन सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार भाजपला साथ देणार का ? असा सवाल निर्माण झाला असून सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानामुळे तसे संकेत देखील मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अरुण गवळी कारागृहातून गिरवतोय शिक्षणाचे धडे, बीएच्या अंतिम वर्षात तीन विषयात पास
- ‘वागळे की दुनिया’ मालिकेच्या नावाखाली लोकांची फसवणूक; चिन्मय सुमितने सत्य आणले समोर
- आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गटांची घोषणा! ‘या’ संघाचा भारताच्या गटात समावेश
- गोवंडीतील रस्त्याला ‘टिपू सुलतान’चं नाव देण्यास भाजपने पाठिंबा दिला होता – शिवसेना
- आयसीसीसी प्रकल्प, व्यावसायिक मालमत्तांसाठी स्मार्ट वॉटर मीटर प्रकल्पांना मंजुरी


