मुंबई:- केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी बिलाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. २६ नोव्हेंबरपासून शेतकरी आपल्या हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं ऑगस्ट २०१० मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना लिहिलेलं एक पत्र आता समोर आलं आहे. या पत्रात शरद पवार यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त केली होती. त्यामुळे आता शरद पवार यांच्यावर विविध माध्यमातून विरोधकांनी निशाणा साधला आहे.
शरद पवारांचे हे पत्र व्हायरल होऊ लागल्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. "एक कृषीमंत्री म्हणून शरद पवारांनी राज्य कृषी पणन मंडळांमध्ये व्यापक सहमती निर्माण करण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सल्ले मागितले होते. एपीएमसी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे फायदे अनेक राज्यांना समजावून सांगण्यात आले होते. अनेक सरकारं अमलबजावणीसाठी पुढे आली होती," असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.
११ ऑगस्ट २०१० मध्ये शरद पवार यांनी शीला दीक्षित यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कृषी कायद्यात बदलाची गरज व्यक्त केली होती. कृषी क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या सहभागाची गरज असल्याचं पवार म्हणाले होते. इतकच नाही तर सध्या ज्या APMC वरुन मोठा विरोध पाहायला मिळत आहे, शरद पवार यांनी २०१० मध्येच APMC कायद्यात बदल गरजेचा असल्याचं म्हटलं होतं. तसंच २००५ आणि २००७ मध्ये लिहिलेल्या पत्राचीही आठवण करुन दिली होती. इतकच नव्हे तर शरद पवार यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही नोव्हेंबर २०११ मध्ये पत्र लिहिलं होतं. त्यात कृषी कायद्यातील सुधारणांसह खासगी गुंतवणूक आणि APMC कायद्यातील बदलाची गरज बोलून दाखवली होती.
दरम्यान, आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. ९ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकार जबरदस्तीने शेतकरी आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे : राष्ट्रवादी
- भाजप खोट्या पध्दतीने पवारसाहेबांचे पत्र फिरवत आहे; राष्ट्रवादीची सारवासारव
- ‘कृषी कायद्यांना विरोध करून आज आरडाओरडा करणारे राज्यसभेत मूग गिळून गप्प का बसले होते’ ?
- शुटिंग दरम्यान मनीष पॉलला कोरोनाची लागण
- मोदी सरकारला दणका! सुप्रीम कोर्टाने दिली नव्या संसद भवनाच्या निर्मितीला तात्पुरती स्थगिती


