🕒 1 min read
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार अशी घोषणा केली होती. आता राज ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु असताना पाहायला मिळत आहे. अशातच राज ठाकरे एका कार्यक्रमात सभांबाबद बोलत असताना म्हणाले, “मी जेव्हा सभा घेतो त्यादिवशी, माझ्या हाता – पायांना घाम फुटतो”.
“लोकांना विश्वास बसणार नाही, पण मला सभेपूर्वी भिती वाटते. माझ्या हाता-पायाला घाम फुटतो. याचे कारण म्हणजे, मलाच माहित नसते मी सभेत नेमकं काय बोलणार आहे. मी सभेपूर्वी अभ्यास करतो, वाचन करतो. पण, सभा सुरू झाली की, वेगवेगळे मुद्दे आपोआप येतात.”
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले , “तुम्ही माझी सगळी भाषणे पाहा, मी कधीच एका लयीत बोलत नाही. माझी भाषणे कधीच सरळ नसतात. मी कधी हा मुद्दा घेतो तर कधी दुसराच मुद्दा घेतो. मी ऐनवेळी कुठला मुद्दा बोलेल, हे मलादेखील माहित नसते. कधीकधी महत्वाचा मुद्दा बोलायचा राहून जातो आणि भलताच मुद्दा येतो. नंतर माझे सहकारी मला येऊन सांगातात, की हा मुद्दा राहिला म्हणून.”
राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील या कार्यक्रमात आल्या होत्या. यावेळी त्यांना सभेपूर्वी तुम्ही तयारी कशी करता? विचारले असता त्यावर म्हणाल्या, ”राज प्रचंड अभ्यासू आहेत. कुठल्याही सभेपूर्वी ते आपल्या खोलीत एकटे बसतात आणि वाचन करतात. ते वाचत असताना कुणीही त्यांच्या जवळ जात नाही. राज ठाकरे कधीच वाचून भाषण करत नाहीत, त्यामुळे ते भाषणापूर्वी प्रचंड वाचन करतात”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
