औरंगाबाद: औरंगाबाद येथील रहिवासी असलेल्या दिलीप लुनावत यांच्या मुलीचा कोव्हिशिल्ड लसीमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी वडिलांनी केंद्र व राज्य सरकारकडून एक हजार कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटला देखील यात प्रतिवादी करण्यात आले आहे.
औरंगाबादचे रहिवासी दिलीप लुनावत यांची मुलगी स्नेहल ही नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. २८ जानेवारी २०२१ रोजी तिने कोविशील्ड लसीचा डोस घेतला होता. मात्र त्याच्या दुष्परिणामांमुळे १ मार्च २०२१ रोजी तिचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. या याचिकेत म्हटले आहे, भारतीय औषध महानियंत्रक, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संचालक, केंद्र व राज्य सरकारने कोरोनावरील लस सुरक्षित असल्याचे खोटे आश्वासन दिले.
माझ्या मुलीसारख्या आरोग्य क्षेत्राशी संबंधितांना बळजबरी लस घेण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच मुलाचा मृत्यू कोविशिल्डच्या दुष्परिणामांमुळे झाला, हे शासनालाही मान्य असल्याचा दावा मुलीच्या वडिलांनी केला आहे. लसीकरणानंतरच्या प्रतिकुल घटनांच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीनेही हे मान्य केल्याचे याचिकेत म्हटले आहे. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बेफिकीर सरकारी यंत्रणांकडून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचे लुनावत यांनी सांगितले. यासाठी प्रतिवादींकडून एक हजार कोटी रुपयांची भरपाई मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
