🕒 1 min read
औरंगाबाद : गेल्या वर्षभरापासून चुकीच्या पद्धतीने वॉर्ड आरक्षण केल्यासंदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र अजूनही या प्रकरणी सुनावणीसाठी तारीख मिळालेली नाही. मंगळवारी (दि.२०) याचिका रजिस्टारकडून न्यायालयात जाण्याची शक्यता होती. मात्र काल अशी कोणतीही प्रक्रीया पार पडलेली नाही. त्यामुळे औरंगाबाद मनपा निवडणूक न्यायालयीन कचाट्यात सापडली असून राजकारणी ठप्प आहेत. कोरोनामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूकीबाबत विचार करणे देखील बंद केले आहे. आता फक्त न्यायालयीन दावे- प्रतिदावे होतील. राजकीय पक्ष, धुरीणांनी शांत राहणेच पसंद केले असून सध्या ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.
मागील वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीसंदर्भातील याचिकेबाबत मंगळवारी (दि.२०) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी तारीख मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे इच्छुकांचे लक्ष पुन्हा दिल्लीकडे लागले होते. मात्र हे प्रकरण अजूनही रजिस्टार यांच्याकडून न्यायालयापर्यंत पोहोचलेले नाही. कोरोनाच्या आधी चुकीच्या पद्धतीने वार्ड आरक्षण केल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक समीर राजूरकर व इतर चार जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणात परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतर एकदाही प्रकरण न्यायालयासमोर आलेले नाही.
निवडणुकीचा बिगुल वाजेल या आशेवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, एमआयएम, वंचित आघाडी या सर्वांनी स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या अनुषंगाने वॉर्डनिहाय तयारी सुरु केलेली होती. अनेकांचे उमेदवार देखील निश्चित झाले होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढला आहे. राज्यासह शहरात कडक निर्बंध आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे. कोरोना काळात देखील देशभरात निवडणूका झाल्या.
पंढरपूर विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक देखील कोरोना काळातच झालेली आहे. त्यामुळे औरंगाबाद पालिकेची निवडणूक देखील आहे त्या परिस्थितीत होऊ शकते, असे इच्छुकांचे म्हणणे आहे. त्यांना केवळ सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाची प्रतीक्षा असल्याचे बोलले जाते. सद्यस्थितीत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या प्रबंधकांकडे आहे.
त्यामुळे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. सर्व संबंधितांचे शपथपत्र दाखल झालेले असेल तर याचिकेवर सुनावणी केव्हा होईल, हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. पुढील तारीख कोणती मिळते याकडे इच्छुकांचे लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खा. भागवत कराड यांची नाशिकच्या ‘या’ प्रकरणात चौकशीची मागणी
- लातूरात शासकीय निर्बंध पायदळी तुडवत कापड दुकान केले चालू; दंडापोटी भरावे लागले पंधरा हजार
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत; भुजबळांची माहिती
- नाशिकच्या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या संवेदना
- हव्यात १ लाख आल्यात फक्त १५ हजार, औरंगाबादेत लसींची प्रतिक्षा कायम!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
