बीड : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या चुलत भगिनी तथा भाजपच्या नेत्या पंकजा आणि प्रीतम मुंडे यांच्यातील राजकीय वाद सर्वांनाच माहिती आहे. एकमेकांवर टीका करण्याची संधी दोन्ही भाऊ-बहिण सोडत नाहीत. सोशल मीडिया असो वा इतर कोणताही कार्यक्रम एकमेकांच्या गैरहजेरीतही या दोघांमधील शाब्दिक युद्ध लोकांनी अनुभवले आहे. त्यातच हे भावंडे जर एकाच व्यासपिठावर एकत्र असतील सर्वांच्या नजरा तिकडे वळणार हे ओघाने आलेच. अन् आज झालेही तसेच.
परळी येथील ब्राह्मण महासभेच्या वतीने विठ्ठल मंदिर जिर्णोध्दार व स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृहाच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व खासदार प्रीतम मुंडे हे बहीण-भाऊ हे अनेक दिवसानंतर एकत्र आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या मंचावर चांगलीच टोलेबाजी झाली. भाषण करताना प्रीतम मुंडेंनी परळीतील खराब रस्त्यांवरुन धनंजय मुंडेंना चिमटा काढला. त्यानंतर, धनंजय मुंडेंनीही तशाच प्रकारचे प्रत्युत्तर दिले.
सुरुवातीला भाषण करताना खा.प्रीतम म्हणाल्या की, ‘मला कार्यक्रमाला येण्यास उशीर झाला, म्हणजे मी मुंडेची कन्या म्हणून उशीर झाला नसून कार्यक्रमास वेळेवर पोहचावे असेच प्रयत्न असतात. मी वेळेत पोहचता यावे यासाठी बीडहून परळी ९० किलोमीटरचे अंतर फक्त सव्वातासात पूर्ण केले. पण शहरात विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे मला इटके काँर्नरहून कार्यक्रमास येण्यास जास्त वेळ लागला’, असे सांगत त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या धनंजय मुंडे यांना टोला लगावला.
प्रीतम मुंडेंच्या भाषणानंतर मंत्री धनंजय मुंडेंनी त्यांना जशास तसं प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेले परळीच्या विकासाचं स्वप्न लवकरच साकार होणार आहे. पण, त्यासाठी पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे. म्हणून प्रीतम मुंडेंना येथे पोहोचायला वेळ लागला असावा’, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, गेल्या अनेक कालावधीनंतर मुंडे बहिण-भाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यामुळे दोन्हीकडच्या समर्थकांना कार्यक्रमाची उत्सुकता लागून होती. ब्राह्मण महासभेने कार्यक्रम आयोजित करून अनेक दिवसानंतर परळीला आलेली राजकीय मरगळ झटकून टाकण्याचे काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘मंदिरे उघडलीच पाहिजे अन्यथा..’, राज ठाकरेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

