मुंबई : मराठा आरक्षणा च्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या असल्या तरी महिनाभरात प्रशासनानं त्यावर कार्यवाही केलेली नाही, असं पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करू, असा इशारा संभाजीराजे यांनी पत्रातून दिला आहे.
काय म्हटलं आहे पत्रात?
खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक आणि शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत आम्ही राज्य शासनाकडे मांडल्या होत्या. 16 जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर राज्य सरकारने आम्हाला मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीला बोलावले होते. 17 जून रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष, राज्याचे महाधिवक्ता यांच्यासह राज्यातील प्रमुख समन्वयक आणि संबंधित सर्व शासकीय विभागांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकारसोबतच्या बैठकीत प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपस्थित मंत्रिगणांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करण्याबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी मागितला होता.याबाबत राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते.
हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता आणि अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. राज्य शासनाने बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाहीये. तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सदस्य मंत्रिगण यांनी या सर्व परिस्थितीचा गांभिर्याने विचार करुन संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रबावी अंमलबजावणी करावी अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘टीममधील तरुण खेळाडूंवर दबाव टाकत आहेत’ ; दिग्ग्जाचा मोठा दावा
- काउंटी स्पर्धेत अश्विनचा बळींचा सिक्सर, सरे संघाकडून खेळताना केली कामगीरी
- मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?
- अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, मालिकाही गमावली
- कार्तिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकिस्तानी क्रिकेट रसिक खुश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

