सातारा : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यामुळे मराठा समाजाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षण रद्द केलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशमुखनगर (ता. सातारा) येथे या परिसरातील काही युवक कार्यकर्त्यांनी मुंडण करून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राज्य शासन बाजू मांडण्यास कमी पडल्याने या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. या वेळी कार्यकर्त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमचे हक्काचे’ अशा घोषणा दिल्या.
कामेरीचे सरपंच सुंदर घाडगे, महेश घाडगे म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन बाजू मांडण्यास कमी पडले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व जमावबंदीचा आदेश असल्याने सर्व नियम व अटींच्या अधीन राहून घरातच मुंडण करून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केलेला आर्थिक आरक्षणाचा मुद्दा योग्य असून, कोरोनाचे संकट व संचारबंदी संपल्यावर मराठा समाजाची भूमिका वेगळी असेल.”
दरम्यान, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे प्रचंड आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न हाताळण्यात अपयश आल्याने आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा द्यावाच, परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे. मेटे यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. विनायक मेटे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
महत्वाच्या बातम्या
- शिष्यवृत्ती परीक्षाही ढकलल्या पुढे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- ‘मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा’


