उस्मानाबाद: राज्यात कोरोनाचे थैमान वाढत असल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी तसेच कोरोनाचे नियम राज्यभरात लागू करण्यात आले आहेत. पुन्हा वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी प्रमाणे परिस्थिती निर्माण होत आहे. अनेक व्यवसाय तसेच सामान्य नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या आर्थिक फटक्यातून एसटी महामंडळाचे उमरगा आगरही सुटले नाही. लॉकडाऊन असल्यामुळे लांब पल्ल्याच्या फेऱ्या थांबवण्यात आल्याने लाखोंचे नुकसान उमरगा आगाराचे झाले आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उमरगा तालुक्यातील एसटी महामंडळाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. १ मे पर्यंत संचारबंदी लागू केल्याने तालुक्यात नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत संचारबंदी लागू असल्याने प्रवासी बस पासून दूर आहेत. अनेकजण स्वतःची दुचाकी, चारचाकीला प्राधान्य देत असून शक्यतो बसचा प्रवास टाळत आहेत. त्यात कोरोनामुळे कायम वर्दळ असणारी बसस्थानके ओस पडली आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडॉउनमुळे आगाराने बुधवारी रात्रीपासून बसफेऱ्या रद्द केल्या आहेत. मुंबई, पुणे, बोरिवली, भिवंडी, नांदेड या लांब, मध्यम लांब पल्ला वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. सोलापूर, लातूर व ग्रामीण मार्गावर आवश्यकतेनुसार बस सोडण्यात येत होत्या. आता त्याही संचारबंदीमुळे बंद करण्यात आल्या आहेत.
पंधरा दिवस बससेवा बंद असल्याने उमरगा आगाराच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार आहे. संचारबंदीमुळे प्रवासी संख्या रोडावली आहे. बस फेऱ्या बंद असल्यामुळे खासगी वाहतूक जोरात सुरू झाली आहे. संचारबंदीने बस आगारातील २८० बसच्या फेऱ्या रद्द झाल्याने २२ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास थांबल्यामुळे उमरगा एसटीच्या विभागाचे प्रतिदिन पाच ते सहा लाखांचे उत्पन्न बुडाले आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना काम नाही, शिवाय त्यांचा पगार देणे गरजेचे असल्याने आगाराला लाखोंचा फटका सहन करावा लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार !’
- संचारबंदीचा नियम मोडणार्यांवर कडक कारवाई करा; गृहमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
- जालना जिल्ह्यात संचारबंदी कागदावर लोकांचा संचार रस्त्यावर!
- विजयानंतर सामनावीर जयदेव उडानकटने शेअर केला त्याचा सक्सेस मंत्र
- ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सैनिकांची काय ही दशा? कुणाच्या पायावर कुणाचे डोके?’


