मुंबई: ‘ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते, तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले. वृद्ध असो की तरुण लतादीदींच्या सुरात रममाण न होणारा विरळच. लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत. हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील. भारतरत्न लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी लता दीदींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे.
त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील.
भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
मंगेशकर कुटुंबीय, संपूर्ण भारतवासियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
ॐ शांती.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2022
लता दीदींच्या आठवणींना उजाळा देतांना पुढे ते म्हणाले, त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणिव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले.
प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गाणकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर कायमच्या आपल्यातून निघून गेल्या आहेत. आज (दि.६) मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या २७ दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. आपल्या सुमधुर आवाजाने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर यांनी अनेक अजरामर गीते गायली आहेत. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण भारतावर शोककळा पसरली आहे.
महत्त्वाच्या बातम्या


