कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव पार पडत आहे. राज्यभरात यंदा कोरोनाच्या सावटामुळे सण, उत्सवांवर बंधन असल्यानं काहीसा उत्साह कमी असला तरी भाविक शक्य तसे मनोभावे हे उत्सव साजरे करत आहेत. या काळात आदिशक्तींची पूजा देशभरात केली जाते.
महाराष्ट्रात तुळजापूर, कोल्हापूर, वणी आणि माहूर या साडेतीनशक्तिपीठांमध्ये पारंपरिक पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविक देवीचे मनोभावे दर्शन घेत असतात.
यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मंदिर बंद असून नवरात्रोत्सव काळात सर्व धार्मिक विधी मात्र परंपरेनुसार पार पडत आहे. मंदिर व्यवस्थापनांनी देखील इतर माध्यमांमधून भक्तांच्या दर्शनाची सोय केली आहे. आज नवरात्रोत्सवाची सहावी माळ म्हणजेच सहावा दिवस! या निमित्ताने करवीरनिवासिनी अंबाबाईची खास पूजा बांधण्यात आली आहे.
आजच्या पूजेचं खास महत्व –
आज अश्विन शुद्ध षष्ठी . शारदीय नवरात्रौत्सवाचा सहावा दिवस. आज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई ची अलंकार पूजा साकारली आहे ती भगवान शंकर काशी सोडून करवीरात निवासाला आले तो प्रसंग सांगणारी . विश्वाच्या निर्मिती नंतर भगवान विष्णूंनी दोन क्षेत्रांची निर्मिती केली एक उत्तरेला काशी दुसरं दक्षिणेला करवीर. उत्तरेची काशी ही मुक्तीदायक ज्ञानपीठ तिचं स्वामित्व भगवान विश्वेश्वराचं तर दक्षिणेचं करवीर म्हणजे मुक्ती बरोबरच भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देणारं महामातृक अर्थात आईचं मोठं शक्तीपीठ.
जेव्हा विष्णूंनी या दोन क्षेत्रांची तुलना केली तेव्हा मुक्तीबरोबर भुक्ती देणारं हे क्षेत्र केवळ एका जवाच्या वजनानं श्रेष्ठ ठरलं म्हणून ही जवा आगळी काशी हा महिमा जाणून भगवान विश्वेश्वर आपल्या सर्व परिवारासह करवीरात आले त्यांनी जगदंबेचं दर्शन घेतले आणि त्या प्रसंगी मातेने त्यांना सांगितले की आपण माझ्या उजव्या बाजूला राहून सर्व भक्तांना तारक मंत्र द्या. त्याप्रमाणे आजही भगवान विश्वेश्वर माता अन्नपूर्णा धुंडीराज गणपती आणि काशी कुंडातील गंगेसह घाटी दरवाजा जवळ असलेल्या मंदिरात राहून भक्तांना मुक्ती देतात, अशी माहिती प्रसन्न मालेकर व प्रथमेश जोशी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
- पवारसाहेब उगाच कोणालाही पक्षात घेणार नाहीत, त्यांची काही राजकीय गणितं असू शकतात : संजय राऊत
- योगी आदित्यनाथ हे ‘वैफल्यग्रस्थ’ ; असदुद्दीन ओवेसींची टीका
- शेतकऱ्यांना भरघोस मदत देऊ म्हणणाऱ्या मुश्रीफांची गाडी संतप्त शेतकऱ्यांनी रोखली
- खडसेंना पक्ष सोडायचाच होता तर त्यांनी रिपाइंमध्ये यायला हवं होतं : रामदास आठवले
- आता भाजपचा ‘हा’ दिग्गज नेता कोरोना बाधित
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

