🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पालखीतील वारकऱ्यांंना अन्नदान करून परत येतांना, रस्त्यामधील दुभाजकावर उभ्या असणाऱ्या कविता विशाल तोष्णीवाल ( वय ४२ रा. महाबळेश्वर) यांना पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने ठार झाल्या. महाबळेश्वर येथील विशाल तोष्णीवाल व त्यांचे कुटुंबीय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात अन्नदान करण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते. रात्री साडे बारा वाजता परत येत असतांना पालखी तळाजवळ लोणंद-फलटण रोड क्रॉस करण्यासाठी मध्यभागील डिव्हायडरवर थांबल्या होत्या. यावेळी कविता यांना लोणंदकडून फलटण जाणाऱ्या पाणी टँकर (क्र. एमएच १०- झेड-२७०८) ने जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कविता विशाल तोष्णीवाल यांच्या सोबत दोन लहान मुलेही होती. सुदैवाने मुले बचावली. हा अपघात मुलांच्या समोर झाल्याने मुलांनी आक्रोश केला आणि मुलांचा हा आक्रोश पाहिल्यावर वारकरी संतप्त झाले. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी लोणंद पोलिस स्टेशनला टँकर चालक यशवंत पावले (वय 30 रा. पावलेवाडी ता. शिराळा जि. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे.कॉ. दतात्रय दिघे करत आहेत.
वारीच्या वाटेवर देहभान होवून चालणे भाग्याचे पण ज्यांना ही वारी करणे शक्य नाही असे लाखो लोक वारीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांची विविधांगी सेवा करून पुण्यपदरी जोडण्याचा प्रयत्न करतात. जगात देण्यासारखा दूसरा आनंद नाही हा अनुभव देखील हे दान करणारे घेतात. आळंदीहून प्रस्थान झाल्यानंतर ते पंढरपूरात हा सोहळा विसावण्यापर्यंत वारीच्या वाटेवरील रहिवाशी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक सेवेसाठी वारीत एखाददुसरा दिवस सहभागी होतात.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
