मुंबई : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खासदार संजय काकडे यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर त्यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत मोठे विधान केले. ‘मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील’, असे खळबळ उडवून देणारे वक्तव्य संजय काकडे यांनी केले. आणि याचा आता राजकीय पटलावर परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी संजय काकडेंवर हल्लाबोल केला आहे.
‘संजय काकडे म्हणतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आहे. काकडेंवर आता तुरुंगात जायची वेळ आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे ते बोलत आहेत. सत्तेचा वापर करून जे धंदे करत होते त्यांनी त्यांचं तोंड बंद ठेवावं. आमचं सरकार अशा लोकांना महत्त्व देत नाही’, असा संताप मलिक यांनी व्यक्त केलाय.
‘भाजपचे सरकार असताना केवळ सरकारच्या माध्यमातून धंदा करणाऱ्यांनी राजकीय भाष्य करू नये. या धंदेबाज लोकांनी राजकारणात पडू नये. त्यांनी त्यांचं काम पाहावं. आमचं सरकार कसं चालवायचं हे आम्ही पाहू’, असा सल्ला मलिक यांनी काकडेंना दिला आहे.
काय म्हणाले होते संजय काकडे?
मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली २५ वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाशी लढण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे, एकट्या मोदींना ते अशक्य’, नवाब मलिकांचा टोला
- ‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला
- औरंगाबादेत हेल्मेट सक्ती प्रकरण, हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
- निवडणूक संपल्याचा परिणाम; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ
- ‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन


