🕒 1 min read
लातूर : बेलकुंडतील गावकऱ्यांनी एक, दोन नव्हे तर चक्क २० वर्ष एस.टी बसची प्रतीक्षा केली आहे. शेवटी आता कुठे या प्रतिक्षेला फळ मिळाले आहे. औसा तालुक्यातील बेलकुंड हे जवळपास ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात पूर्वी सोलापूर आणि लातूरला जाणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या बसेस येत असत; मात्र जवळपास २० वर्षांपासून गावात बस येणे बंदच झाले होते. परिणामी, तालुक्याला शिक्षणासाठी, कार्यालयीन, खासगी कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांची, विद्यार्थ्यांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड होत होती.
बेलकुंड येथील नागरिकांना, विद्यार्थ्यांना औसा अथवा लातूरला जाण्यासाठी एक किलोमीटरची पायपीट करत बेलकुंडमोड गाठावे लागत हाेते. मोडवर थांबूनही अनेक बसेस उड्डाण पुलावरून जात असल्याने प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत होते. दरम्यान, सरपंच विष्णू कोळी यांनी यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला हाेता. गत २० वर्षांपासून होत असलेल्या बसच्या मागणीकडे महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंगळवारपासून औसा-बेलकुंड ही नवीन बससेवा सुरू केली आहे. यातून प्रवाशांची सोय होणार आहे.
गावात बस येताच जल्लोष
गावात बस दाखल झाल्यानंतर फटाके फोडून ‘लालपरी’चे ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी बसची पूजा करून बसचालक अनिल गोरे, वाहक एम.एच. नागरगोजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील जेष्ठ मंडळी महिला व मुलांचा सहभाग होता.
महत्वाच्या बातम्या
- व्यापाऱ्याकडून तब्बल ४३ शेतकऱ्यांची फसवणूक
- … तर विरोधी पक्षनेत्यांना त्यांचा अनुभव पणास लावता आला असता’
- पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला द्या-आ.प्रकाश सोळंके
- २० वर्षानंतर येणार ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल!
- ‘महाराष्ट्रात विरोधी पक्षाला जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही’


