🕒 1 min read
लातूर : सध्या राज्यात फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. कोण कोणाला कसले आमिष दाखवून फसवलं याचं काही सांगता येत नाही. अशीच एक घटना लातूर येथे घडली आहे. एका व्यापाऱ्याने एक, दोन नव्हे तर तब्बल ४३ शेतकऱ्यांना फसवत २ कोटींचा चुना लावला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
व्यापारी वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हा डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मूगाची थेट गावातून खरेदी करीत होता. बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देतो म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा आपला माल विकण्यास सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे तो व्यापारी शेतकऱ्यांना पैसेही देत होता. यातून त्याने अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे तानाजी निवृत्ती देवकर यांनी २०१८-१९ मध्ये त्यांच्या शेतातील पाच लाख ४० हजार रुपयांचे १३३ क्विंटल सोयाबीन डोंगरे याला दिले. त्यावर डोंगरे याने देवकर यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या नावे धनादेश दिले होते. परंतु, ते बँकेत वटले नाहीत. काही दिवसानंतर देवकर यांनी डोंगरे यांच्याकडे विकलेल्या सोयाबीनच्या पैशाची मागणी केली. परंतु, त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.
त्यानंतर देवकर यांनी अधिक माहिती घेतली. त्यांच्यासारख्या ४३ शेतकऱ्यांनाही डोंगरे याने पैसे दिले नसल्याचे समोर आले. या सर्व शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या शेतमालाची रक्कम दोन कोटी १७ लाख ९० हजार ७५५ रुपये असून या सर्वांची फसवणूक झाली आहे. याबाबत देवकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संशयित डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या पाचशेपार, ७ जणांचा मृत्यू
- धोक्याची घंटा : औरंगाबादमध्ये मोठी लाट येण्याचा केंद्रीय आरोग्य पथकाचा इशारा
- संजय राठोड ते सचिन वाझे, शिवसेनेवर दबाव वाढतोय ?
- शेती, पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करणार : अजित पवार
- महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आला कि त्याला विरोध करायचा हेच शिवसेनेचे धोरण


