मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता देशासाठी संदेश दिला. यावेळी त्यांनी कोरोनाचं युद्ध अजून संपलं नसून लस येईपर्यंत बेफिकिरी करू नका, असं आवाहन जनतेला करतानाच येणाऱ्या सर्वधर्मीय सणांच्या शुभेच्छा देखील दिल्या.
मोदींनी केवळ सात ते आठ मिनिटं केलेल्या भाषणातून अनेकांचा हिरमोड झाल्याचं दिसून आलं होतं. संवादामध्ये ते परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील शेती व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीबद्दल अधिक काही मदतीची घोषणा करतील अशी अपेक्षा केली जात होती, मात्र त्यांनी इतर कोणत्याही विषयावर न बोलता केवळ कोरोनाबद्दल सतर्कता घेण्याचं आव्हान करत सणांच्या शुभेच्छा दिल्या. यावरूनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदींवर तोफ डागली आहे.
सामना अग्रलेख :
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते. त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखे काहीच नव्हते. देशांतर्गत खऱ्या संकटाची त्यांनी जाणीव करून दिली. त्यांनी कोरोनासंदर्भात सत्य तेच सांगितले. हीच त्यांच्या अध्यात्माची ताकद. ते आले, ते बोलले. शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा. या तेजानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल. भारतीय जनता पक्षाची हीच भावना असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा!
पंतप्रधान मोदी यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत, हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झाले. मोदी राष्ट्राला उद्देशून मंगळवारी संबोधन करणार आहेत, असे जाहीर केल्यापासून अनेकांच्या झोपाच उडाल्या होत्या तर कित्येक जण आस लावून टीव्हीसमोर बसले होते. पण यापैकी काहीच घडले नाही. मोदींनी कुणाला धक्काही दिला नाही व कुणास तूपलोणीही फासले नाही. मोदी यांनी एक मोजके व आटोपशीर संबोधन केले.
त्यांनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचे सांगितले. लोकांनी अजिबात ढिलाई करू नये, असा इशाराच वडिलकीच्या नात्याने दिला. मोदी यांनी फक्त सात-आठ मिनिटांचे कोरोनासंदर्भात जे प्रबोधन केले ते गेल्या सात-आठ महिन्यांतील उत्तम संबोधन होते. लॉक डाऊन संपलाय, पण कोरोना संपलेला नाही. देश अजूनही कोरोनाशी लढतोय. ही माणूस जगविण्याची, मानवतेची लढाई असल्याचे त्यांनी सौम्य शब्दांत सांगितले. मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र व छातीपर्यंत वाढली आहे.
त्यांच्या चेहऱ्यावरही वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरू केलेली दिसते. मंगळवारच्या त्यांच्या संबोधनात काही वेळा ‘रामचरित मानस’चा संदर्भ त्याच भावनेतून आलेला दिसला. कोरोनाचा धोका समजण्यासाठी पंतप्रधानांनी ‘रामचरित मानस’चा संदर्भ घेतला. लॉक डाऊनच्या सुरुवातीला मोदींनी ‘महाभारत’ काळात देशाला नेले होते. महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी 18 दिवस लागले होते. कोरोनाला हरवण्यासाठी 22 दिवस लागतील, असा शंख मोदींनी फुंकला होता, पण सात महिन्यांनंतरही हे युद्ध संपले नसल्याचा शंख नव्याने फुंकण्यात आला आहे.
मोदी यांनी लोकांना सांगितले आहे, ‘हात साबणाने स्वच्छ धूत जा. तोंडाला मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. दोन फुटांचे सुरक्षित अंतर एकमेकांत ठेवा.’ पंतप्रधानांनी हे सर्व पालकत्वाच्या नात्याने सांगितले व लोकांनी त्यांचे ऐकायला हवे. अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण सगळे जात आहोत. एक छोटीशी चूक आपला आनंद मारू शकते. मी आपल्या सगळ्यांना सुरक्षित व आनंदी पाहू इच्छितो. जीवनात कर्तव्यपालन करताना सावधानता बाळगली तरच जीवनात ‘खुशी’ची बहर कायम राहते, असा लाखमोलाचा संदेश मोदींनी दिला व तो बरोबर आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाथाभाऊ आता दिल्या घरी सुखी रहा – रावसाहेब दानवे
- लॉकडाऊन मध्ये पोस्ट ऑफिस सेवा वापरण्याचा कल वाढला
- नाथाभाऊ जाऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, ‘त्यांना शुभेच्छा’ : केशव उपाध्ये
- जगातील सर्वात प्रभावशाली देशांच्या यादीतून भारताला वगळलं
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

