मुंबई:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर असंवदेनशील असल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांना आज इतका मोठा संघर्ष करावा लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. शेतकरी घरदार सोडून आबालवृध्दासह रस्त्यावर उतरले आहेत. थंडीत रस्त्यावर ठिय्या मारून बसले आहेत. त्यावरून शेतकऱ्यांच्या भावना किती तीव्र आहेत हे लक्षात येईल. सर्व गोष्टी बाजूला ठेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे, त्याउलट ते नक्की शेतकरी आहेत का? यापासून त्यांचे कपडे, त्यांच्या वस्तूंचे ब्रँड, ते इंग्रजी कसे बोलतात? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण आता तरी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यावर लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना
- खुशबू, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने सोडली कॉंग्रेसची साथ
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला


