मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांची महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेच्या सहाव्या जागी निवडून येण्यासाठी जोरदार प्रयत्न दिसत आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत. शिवसेनेकडून संभाजीराजेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली, मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय राज्यसभेची उमेदवारी मिळणार नाही, असे शिवसेनेने जाहीर केले आहे. संभाजीराजेंनी मात्र ही ऑफर नाकारली आहे. मात्र शिवसेनाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोणीही असेल तरी अपक्षांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे दोन उमेदवार देणार आणि ते दोन्हीही निवडून आणणार असे ठणकावून सांगितले. राऊत म्हणाले, “दोन जागा शिवसेना लढवणारच. आम्ही दोन्ही जागी उमेदवार देऊ आणि ते निवडून ही आणू. संभाजीराजेंनी अपक्ष लढण्याची निर्णय घेतला आहे. “राज्यसभेच्या जागेसाठी जेव्हा एखादा उमेदवार असं सांगतो, तेव्हा त्यांच्याकडे निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था त्यांनी केलेली असते. ज्याअर्थी त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, त्याअर्थी त्यांना कोणीतरी पाठिंबा देतं असणार. अशावेळी आम्ही मध्ये पडणं योग्य नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, आत्ता असं दिसत आहे की त्यांच्याकडे निवडून येण्याइतपत आवश्यक तेवढी मते नाहीत, मग त्यांनी मतं आमच्याकडे मागितली. पण आम्हाला शिवसेनेचेच दोन उमेदवार निवडून आणायचे आहेत. आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, मग ते कोणीही असो. आम्ही एक पाऊल पुढे आलो, त्यांनाही सांगितलं की तुम्हीही एक पाऊल पुढे या. पण शेवटी निर्णय हा त्यांचा आहे. पण दोन उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील. उद्धव ठाकरेंच्या वतीने मी हे सांगतोय. ये उद्धवजी के मन की बात है, संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :


