मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सतेज पाटील यांच्यासह राज्यातील मराठा समाजाचे समन्वयक यांची महत्वाची बैठक पार पडली आहे.
तब्बल अडीच तास झालेल्या या बैठकीनंतर राज्य सरकारतर्फे अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे आणि सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ‘सारथीला स्वायतत्ता देण्यात आली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ, तारादूत प्रकल्पासंदर्भात पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सारथी संदर्भातील बैठक घेतील. कोपर्डीचा विषय न्याप्रविष्ठ आहे. राज्य सरकारकडून कार्यवाही पूर्ण झालेली आहे. न्यायालयात ती केस लवकर बोर्डावर यावी यासाठी सरकारी वकील प्रयत्न करतील,’ असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
तर, ‘सुपर न्यूमररी विषय महाधिवक्ता यांच्याकडे आहे. कंटेम्पट ऑफ कोर्ट होणार नाहीना याबाबत चर्चा सुरु आहे. नोकरीची चार ते पाच प्रकरणे प्रलंबित आहेत. एसटी महामंडळातील प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नोकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर प्रकरण थांबलेलं आहे तिथून ते प्रकरण पुढे नेण्यासाठी शासनानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवलेलं आहे. राज्य सरकार यासंबंधी शासन निर्णय काढणार आहे. काही जणांचे प्रश्न निर्माण झाला तर त्यावर मार्ग काढला आहे,’ असं देखील अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे हा देखील महत्वाचा मुद्दा असून याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे. १४९ गुन्हे मागे घेण्यास सरकारने तयारी दर्शवली असून १ गुन्हा मागे घेता येणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये १४९ गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. यासोबतच, इतर मुद्द्यांबाबत देखील सरकारने सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले असून त्याकरिता १४ दिवसांचा अवधी मागितला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला ‘शिवप्रसाद’ देणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची कौतुकाची थाप !
- शिर्डीचे साईमंदिर कधी उघडणार? खा.सुजय विखे म्हणाले..
- राम मंदिरासाठीच्या निधीबाबत राष्ट्रवादीकडूनही चिंता, केली ‘ही’ मागणी
- ‘आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार’, चंद्रकांत खैरेंची माहिती
- ‘झारीतील शुक्राचार्य नेमके कोण? मराठा समाजाच्या मागण्या का मान्य होत नाहीत?’


