उस्मानाबाद : मराठा आरक्षण व मागण्यांसदर्भात कशामुळे अडथळे येत आहेत, झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? असा सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात प्रसिध्दी पत्रकात पक्षाची आणि व्यक्तिगत भूमिका स्पष्ट केली आहे.
आमदार पाटील यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांनी भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. भारतीय जनता पार्टी व छत्रपती राजेंची भूमिका एकच असून, आम्ही त्याचे समर्थन करतो व जाहीर पाठिंबा देतो. छत्रपती उदयनराजे यांची मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी अगदी रास्त आहे व यापूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी देखील केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे केलेल्या ५ मागण्यांबाबत आर्थिक तरतुदीसह कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा, ही अपेक्षा आहे.
मागण्या मान्य न होण्यामागे मोठ्या शक्तीचा हात
सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांना योग्य आर्थिक तरतुद, गरीब मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह,२१८५ निवड झालेल्या उमेदवारांना नोकरी,या मागण्या समाजासाठी गरजेच्या असून, या मागणीला १५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही संवेदनशील विषयावर कार्यवाही होत नाही. या सर्व मागण्या संपूर्णतः राज्य सरकारच्या अखत्यारीत असून फडणवीस सरकारने या बाबी कृतीत आणल्या होत्या. आत्ताचे लोकशाहीतील राजे यावर कार्यवाही का करत नाहीत, हा प्रश्न पुढे येतो. याचा अर्थ कुठली तरी मोठी शक्ती हे होऊ देत नाही, असाच होतो. त्यामुळे राज्य सरकारमधील झारीतील शुक्राचार्य नेमके कोण आहेत, याचा शोध घ्यावा लागणार आहे.
राज्याने अगोदर विशेष अधिवेशन बोलवावे
राज्य सरकारने ३४२ (अ) प्रमाणे परिपूर्ण अहवाल महामहिम राज्यपालांकडे पाठविणे आवश्यक आहे. राज्य सरकारने त्यांच्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण केल्यानंतर केंद्राचा विषय येतो. राज्याने अगोदर विशेष अधिवेशन बोलवावे व त्यांच्या अखत्यारीतील कार्यवाही पूर्ण करावी, त्यानंतर केंद्राकडील कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी व छत्रपती उदयनराजे बोलल्याप्रमाणे आमची सर्वांची आहे, ती आम्ही तत्परतेने पार पाडू, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गहिनीनाथ गडाच्या पायी वारीला परवानगी द्या’, पंकजा मुंडेंचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
- ‘..तर महिनाभरात तिसरी लाट येणार’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा
- ‘शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार’, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- १५० कोटींच्या सुपरस्पेशालिटीत एकही शस्त्रक्रिया नाही, खा.जलील यांचा खंडपीठात दावा
- ‘पदोन्नती आरक्षणावर महाराष्ट्र ढवळून काढणार’, ऊर्जामंत्री राऊत यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
