मुंबई : १७ व्या लोकसभेतील एकूण ५ अधिवेशनांत महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी एकूण ६ हजार ९४४ इतके प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींचे लोकसभेतील एकूण प्रमाण ९ टक्के आहे. तरी या खासदारांनी सभागृहात मांडलेल्या प्रश्नांचे प्रमाण २९ टक्के इतके लक्षणीय राहिले. अभ्यासासाठी निवडलेल्या १० मंत्रालयीन खात्यांपैकी सर्वाधिक ५०७ प्रश्न हे आरोग्याशी निगडीत असल्याचे संपर्क संस्थेच्या अहवालात दिसून आले.
मुंबईस्थित ‘संपर्क’ या धोरणविषयक अभ्यास व पाठपुरावा करणाऱ्या संस्थेने महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या लोकसभेतील कामगिरीचा आढावा घेत शुक्रवारी (दि. १८ जून) अहवाल प्रकाशित केला. मे २०१९ ते मार्च २०२१ या काळातील लोकसभेच्या ५ अधिवेशनांत विचारलेल्या तारांकित व अतारांकित प्रश्नांसंदर्भातील माहितीचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले.
गेल्या पाच अधिवेशनांत महाराष्ट्रातील खासदारांनी सरासरी १५४ प्रश्न विचारले. राष्ट्रीय पातळीवर ही सरासरी केवळ ४९ प्रश्न एवढी आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील खासदारांची प्रश्न विचारण्याची सरासरी ही राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट ठरली. ५ अधिवेशनात मिळून संसदेत विचारल्या गेलेल्या एकूण २३ हजार ९७९ प्रश्नांपैकी महाराष्ट्रातील ३८ पुरुष खासदारांनी विचारलेले एकूण ५ हजार ९४६ तर ७ महिला खासदारांचे ९९८ प्रश्न समाविष्ट आहेत.
भाजपच्या खासदारांनी विचारले सर्वाधिक प्रश्न
पक्षनिहाय कामगिरीचा विचार करता २४ खासदार असलेल्या भाजपने ३ हजार ११६ प्रश्न, १७ खासदार असलेल्या शिवसेनेने २ हजार ५३९ प्रश्न, चार खासदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ९५९ प्रश्न तर काँग्रेसचे एकमेव खासदार असलेल्या चंद्रपूरच्या सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी १२३ प्रश्न मांडले. एमआयएमचे औरंगाबादेतील खासदार इम्तीयाज जलील यांनीही १७९ प्रश्न तर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी २८ प्रश्न पटलावर आणले. १५ खासदारांनी प्रत्येकी १ तर १४ खासदारांनी एकही प्रश्न मांडला नाही.
जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रश्नोत्तरांचा तास हे एक महत्वाचे आयुध आहे. हे आयुध वापरुन चर्चा घडवून आणण्यात महाराष्ट्रातील खासदार आघाडीवर असल्याचे संपर्कच्या अहवालातून स्पष्ट झाले असून ही कामगिरी उंचावत जाणे राज्याच्या हिताचे ठरेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवस्मारकाचं काम लवकर सुरू करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
- ‘परिचारिकांवर कोणाच्या आदेशाने लाठीचार्ज केला?’, अजित पवारांनी दुर्लक्ष केल्याने भाजप आक्रमक
- अजित पवारांच्या बैठकीदरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कंत्राटी परिचारिकांवर लाठीचार्ज
- ‘तुला प्रोटोकॉल कळतो का रे?’, अजित पवारांनी बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना झापले
- ‘तुम्ही काळजी करू नका, आमचं व्यवस्थित सुरुये!’, आघाडीत बिघाडीच्या चर्चेवर अजितदादांचे स्पष्टीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

