🕒 1 min read
मुंबई : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना आज (शुक्रवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत बोलावण्यात आले आहे. गुरुवारी दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापकासह दोघांची हत्या केल्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे. नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे आतापर्यंत घाटीत आठवडाभरात आठ जणांची हत्या झाली आहे. गुरुवारी कुलगाम भागात एका हल्लेखोराने हिंदू बँकेच्या व्यवस्थापकावर पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. “ज्या पद्धतीने काश्मीर मध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत. ते पाहता हिंदूंना सरकारने स्वसंरक्षणासाठी बंदुकांचे परवाने तसेच ते चालविण्याचे प्रशिक्षण दिल पाहिजे,” असे संदीप देशपांडे म्हणाले.
काश्मीरमधील स्थिती फार गंभीर-
शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील केंद्र सरकारला जाब विचारला आहे. काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. काश्मीरमध्ये १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
मंगळवारी काश्मीरमध्ये एका हिंदू महिला शाळेच्या शिक्षिकेचीही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यापूर्वी, दहशतवाद्यांनी गेल्या आठवड्यात तीन ऑफ-ड्युटी पोलिस आणि एका टेलिव्हिजन अभिनेत्री यांची वेगवेगळ्या प्रकारे गोळ्या झाडून हत्या केली होती.
तसेच काही दिवसांपूर्वी, एका हिंदू सरकारी कर्मचाऱ्याची त्याच्या कार्यालयात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, जो पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर, अमित शहा आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा दिल्लीत भेटणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
