🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात जिल्हाधिकाऱ्यांनी अंशतः लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याच्याच भाग म्हणून शनिवारी आणि रविवारी पूर्ण स्वरूपाचे लॉकडाऊन लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यातच रेल्वे बोर्डाची परीक्षा आज शहरात होती. परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीला गोंधळल्यामुले ती औरंगपुऱ्यात तैनात असलेल्या पोलिसांना सांगताच पोलिसांनी तिची मदत केली.
लॉकडाऊनमुळे शहरात पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला आहे. शहरात विविध ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड आणि त्यांचे सहकारी एस. एस. पुरी, आर. के. वाणी आणि हनुमंत चाळनेवाड हे आपले कर्तव्य बजावत होते.
शनिवार आणि रविवार पूर्णपणे कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र नियोजित असलेल्या परीक्षांना त्यातून सवलत देण्यात आली आहे. शनिवारी पनचक्की परिसरातील पीईएस महाविद्यालयात रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा होती. विविध पदांसाठी असलेल्या या परीक्षेसाठी बुलढाणा, शेगाव, जालना, हिंगोली आणि परभणी येथून विद्यार्थी आले होते. या विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये अर्ज प्रक्रिया केली होती. दोन वर्षानंतर होणा-या या परीक्षेसाठी काही विद्यार्थी खासगी वाहनाने तर कुणी एसटीने शहरात दाखल झाले.
परीक्षा पत्रकावर दिलेला पत्ता गुगलमॅपवर दुसरेच ठिकाण दाखवत असल्यामुळे परीक्षार्थी गांगरुन गेले. दोन वर्षानंतर परीक्षा त्यातही लॉकडाऊन त्यामुळे परीक्षार्थींची गैरसोय झाली. शहरातील रिक्षा चालकांनी देखील कोरोना आणि नियमांच्या नावाखाली दीडशे ते दोनशे रुपये भाडे घेतले. परीक्षेची वेळ जसजशी जवळ येत होती. तशी परीक्षार्थ्यांची धावपळ उडाली होती. त्यातच मिनाक्षी धांदल ही परीक्षार्थी रस्त्यावर उभी राहून वाहनाची वाट पाहत होती. बुलढाण्याहून प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी तिने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला.
पैठणगेट येथील एका वसतीगृहातून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मिनाक्षी बाहेर पडली. मात्र, वाहन मिळत नसल्याने ती पैठणगेटपासून औरंगपु-यापर्यंत पायी गेली. पण तेथूनही वाहन मिळत नसल्याने तिची धडधड आणखीनच वाढली. त्यातच औरंगपु-यात पोलिसांना पाहून ती आणखी घाबरली. पोलिसांनी तिला कुठे जायचे आहे असे विचारल्यामुळे ती बिचकत म्हणाली आज परीक्षा आहे. अन लगेचच तिला रडूही कोसळले.
तिची अवस्था पाहून बंदोबस्तावर असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव गायकवाड, एस. एस. पुरी, आर. के. वाणी आणि हनुमंत चाळनेवाड यांनी तिला धीर दिला. पोलिसांनी तिला पिण्यासाठी पाणी दिले. घाबरु नको असे म्हणत तुझे परीक्षा केंद्र कोणते सांग, आम्ही सोडवण्याची व्यवस्था करतो. असे म्हटल्यावर मिनाक्षीचे रडू थांबले. त्यानंतर चाळणेवाड यांनी तिला दुचाकीवर बसवत परीक्षा केंद्र असलेल्या पीईएस महाविद्यालयात नेऊन सोडले. तसेच तिला परीक्षेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचल्याने मिनाक्षीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
गृहमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक
क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी परीक्षार्थीला वेळीच मदत केल्याची माहिती वा-यासारखी पसरली. ही बाब गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी व्टिट करत क्रांतीचौक पोलिसांसह शिपाई चाळणेवाड यांचे कौतुक केले. मिनाक्षीने देखील पोलिस दादांमुळे परीक्षेला वेळीच पोहोचता आल्याचे सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

