मुंबई – मागील आठ ते दहा दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. पावसामुळे नुकतीच पेरणी करण्यात आलेले सोयाबीन सह इतर पिके पिवळी पडत असून शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी संकटात असताना पुन्हा अस्मानी संकटाने देखील शेतकऱ्यांवर खूप मोठा आघात केला आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे
अतिवृष्टी गारपीट ढगफुटी भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास सरकारने सजग राहून तात्काळ पंचनामे करणे बाबत आदेशित करणे आवश्यक आहे. परंतु महा विकास आघाडी सरकारने अद्याप कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्यासंदर्भात आदेश दिले नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही ही बाब भाजपा किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावेळी आपत्ती व्यवस्थापनानुसार शासनाच्या आदेशाची वाट न पाहता जिल्हाधिकारी स्तरावर संबंधित अतिवृष्टी ग्रस्त भागाचे पंचनामे करणेबाबत संबंधित तहसीलदारांना सूचना करण्यात यावी. शेतकऱ्यांना मदत करायची किंवा नाही ते सरकार ठरवेल तुम्ही पंचनामे तात्काळ करा अशी सूचना देखील माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाला केली आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा, परतुर, घनसावंगी, जालना ग्रामीण अंबड बदनापुर यासह भोकरदन जाफराबाद तालुक्यातील काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून पिकांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात काही रस्त्यांवरील पूल वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे तसेच झाडे उन्मळून पडल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच गावातील वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर आपत्कालीन परिस्थितीत पंचनामे करणेबाबत सर्व तहसीलदारांना सूचना करावी व शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासकीय पातळीवर पंचनामे करणेबाबत पुढाकार घ्यावा अशी सूचना लोणीकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना केली आहे.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हाधिकारी स्तरावर निर्णय घेऊन पंचनामे करता येऊ शकतात त्यासाठी शासनाच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही मागील पंचवार्षिक मध्ये तत्कालीन पालकमंत्री पदावर असताना दुष्काळ अतिवृष्टी बोंडआळी गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित आपत्तीचे पंचनामे करणेबाबत अधिकार असतात असेही लोणीकर यावेळी म्हणाले. अनेक तहसीलदारांकडे पंचनामे बाबत शेतकऱ्यांनी मागणी केली असता आम्हाला अद्याप पंचनामे करण्याचे आदेश नाहीत अशा प्रकारची माहिती तहसिलदारांकडून दिली जात आहे त्या पार्श्वभूमीवर लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शासनाच्या आदेशाची वाट न पाहण्याची सूचना केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
- अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आता मदतीचा ओघ सुरु, निलेश राणेंचा पूरग्रस्तांना मदतीचा हात


