🕒 1 min read
मुंबई : यंदाच्या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. विश्वचषक स्पर्धा मागील १५ वर्षात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात होणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने योजना आखण्यासाठी कंबर कसली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली टी-२० मालिका या नियोजनाचा महत्त्वाचा भाग मानता येईल. मात्र, या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मासह काही स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या काही युवा खेळाडूंची नावे ही विश्वचषकासाठी सुचवले जात आहेत. जो तो त्याच्या आवडीच्या खेळाडूंची नावे विश्वचषकासाठी संबंध करत आहे. या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर माजी सलामीवीर गौतम गंभीरने टी-२० विश्वचषकासाठी आपले टॉप ३ फलंदाज निवडले आहेत. त्याने विश्वचषकासाठी आपल्या पहिल्या तीन फलंदाजांची नावे सांगितली आहेत. परंतु यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पहिल्या तीन फलंदाजांमध्ये गंभीरने केएल राहुलचे नाव घेतले आहे. त्याचबरोबर विराट कोहलीचे नाव देखील घेतलेले नाही.
गौतम गंभीरने स्टार-स्पोर्ट्स वाहिनीशी केलेल्या संवादात कर्णधार रोहितसह इशान किशनला डावाची सलामी देण्यासाठी निवड केली आहे. तर विराटच्या जागी सूर्यकुमारला तिसरा क्रमांक दिला आहे. गंभीरने स्पष्टपणे सांगितले की, ‘टी-२० विश्वचषकात डावाची सुरुवात करण्यासाठी मी रोहित आणि ईशानची निवड करेन. तर मी सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर खेळवणार आहे.’ गंभीरच्या पहिल्या तीन खेळाडूंमध्ये केएल राहुलचे नसणे निश्चितच आश्चर्यकारक आहे कारण अलीकडच्या काळात जर कोणत्याही फलंदाजाने धावा केल्या असतील तर तो केएल राहुल आहे.
आयपीएलच्या १५व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने १५ सामन्यात ६१६ धावा केल्या होत्या. अशा स्थितीत केएल राहुलला पहिल्या तीन फलंदाजांमध्ये स्थान न देण्याबाबत वाद निर्माण होऊ शकतो. पण हा निर्णय फक्त गंभीरचा स्वत:च्या आवडीचा आहे. गंभीरने त्याचा धोरणात्मक दृष्टिकोन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारताचा युवा संघ तयार करण्यात आला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मासह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. सुरुवातीला संघाचे कर्णधारपद के एल राहुल कडे सोपविण्यात आले होते. मात्र त्याला दुखापत झाल्याने ऋषभ पंतच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. सध्या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघ २-० ने आघाडीवर आहे. या दोन्ही संघातील तिसरा सामना १४ जूनला विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
