मुंबई – महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे आणि या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्यसरकारकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान या आपत्तीग्रस्त भागात मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. याबाबत आज तातडीने आदेश काढण्यात येणार असून आदेशाची वाट न बघता तातडीने मदत कार्य सुरु करण्यात यावे असे यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीचा फटका महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना बसला आहे. राज्यावर आलेल्या नैसर्गिक संकटाशी लढताना राज्यसरकार हे खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये शिवभोजन थाळीचा इष्टांक दुप्पट करण्यात आला आहे. म्हणजेच या आपत्तीग्रस्त भागातील शिवभोजन केंद्रावर आत्ता दुप्पट क्षमतेने शिवभोजन थाळीचे वितरण केले जाणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
पूरपरिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यात लाईट नाही अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाईट नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन अँपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
या सहा आपत्तीग्रस्त जिल्ह्यात प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हाऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला ५ किलो डाळ देण्याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे काही नागरिकांना दुर्घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. त्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याची भावना व्यक्त करतानाच मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल
- ‘राज्यावरील संकटात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अर्थ म्हणजे ‘मला जमत नाही!’
- अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आता मदतीचा ओघ सुरु, निलेश राणेंचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

