🕒 1 min read
मुंबई : वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकीने 1 मार्च रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असं तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर तिच्या या पोस्टवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.
आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केतकीला मोठ्याप्रमाणात ट्रोल केले जात आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील भांडुप पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) मुंबई प्रदेश अध्यक्ष राजू थाटे यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
“महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत नसून ते मुंबई दर्शनासाठी येतात, या त्यांच्या वक्तव्यावरून हा समाज फुकटा आहे आणि त्या महामानवाचा आदर करत नाहीत हे स्पष्ट होत आहे,” थाटे यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
जाणून घ्या केतकी चितळेची फेसबुक पोस्ट नेमकी काय आहे ?
आपल्या देशात,तुम्ही बुरख्यात राहिलात, मुसलमान आहोत हे दाखवून देणारी टोपी घातलीत तर ते धर्म स्वातंत्र आहे.किरपान (एक छोटा चाकू) सिखानी ठेवला, तर ते धर्मात लिहीलय.आम्ही कंदमूळ खाणार नाही, म्हणून जैन मेनू वेगळा असतो, ते धर्म पालन.अग्नी मंदिर फक्त आमचे प्रार्थना स्थान आहे, दुसऱ्याना परवानगी नाही त्याच्याजवळ यायची, असं म्हणत पारसी आपला धर्म जपतात.चर्च मधील फादर, फक्त यशु बद्दल नव्हे तर राजकारण आणि बाकी धर्म (एक टारगेट धर्म, समजून घ्या कुठला) कसे वाईट, यावर भाष्य करतात, पण ते त्यांचं सरमन म्हंटलं जातं.नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क.
आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.
ब्राह्मण द्वेष, किंवा ब्राह्मण कसे श्रेष्ठ, यातच आम्ही इतके गुंतलो आहोत, की ‘मुसलमान, क्रिश्चन मिळून या ब्राह्मणांना हकलवून लावू’ असं ही म्हणतो. आपण तर आपल्या महापुरुषांनाही नाही सोडलं हो! आपण तर त्यांचीही वाटणी केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि सावरकर तुमचे, आंबेडकर फक्त नवबौद्धांचे! आपली लायकी आपणच काढली, आणि अजूनही काढतोय.
जागे व्हा जरा.मी सर्वप्रथम एक भारतीय आहे. मी हिंदू विचारसरणीचे पालन करते.मला कुठल्याही धर्माचा किंवा जातीचा द्वेष नाही, पण धर्म आणि जातीच्या आधारावर वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिंचा द्वेष नक्कीच आहे.#UniformCivilLaw
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

