कोल्हापूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू असली तरीही ही चौकशी म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. तर, हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान असून भाजपा त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पिंपरी येथे सांगितले.
पाटील म्हणाले की, उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचा आदेश देताना गरज असल्यास गुन्हा नोंदविण्याचाही आदेश दिला होता. न्यायालयाचे निकालपत्र वाचले तर हे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ चौकशीचा आदेश दिला होता तरीही गुन्हा नोंदवून छापे मारले ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची तक्रारही निरर्थक आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांना हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘माझ्यावर बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा काय देता, आजच विनाविलंब दावा दाखल करा,’ असं खुलं आव्हान मुश्रीफ यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, ‘यात न्यायालयाची कसली आली बदनामी ? सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपनेच ही खेळी केली आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर बदनामीचा खटला दाखल करावाच. ज्यामुळे दूध का दूध अन् पाणी का पाणी होऊन जाईल.’
यासोबतच, ‘अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या तपासाबाबत एनआयए काहीच सांगत नाही. या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचाच हात असण्याची शक्यता आहे. माफीचा साक्षीदार होण्यासाठीच त्यांनी शंभर कोटीच्या आरोपाचे पत्र दिले. भाजपच्या दबावानेच हे पत्र दिल्याचा आम्हाला संशय आहे. यामुळे याची चौकशी व्हायला हवी. ते राहिले बाजूलाच. केवळ या गोष्टीकडून लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच भाजपने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय कारवाई करायला लावली,’ असा गंभीर आरोप देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सक्ती करू नका – राजेश टोपे
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- पंतने ‘या’ कृतीमुळे जिंकले सर्वांचे मन : पहा व्हिडीओ
- लसीच्या किंमती एकच ठेवा, नफा कमावण्याची ही वेळ नाही : केजरीवाल

