मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग आणि पोलीस बदल्यांप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यावर आज देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर दोन तास चौकशी देखील करण्यात आली. ही चौकशी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन यंत्रणेवर आणि राज्य सरकारवर टीका केली. या चौकशीदरम्यान आपल्याला सहआरोपी करण्याचा प्रयत्न असल्यासारखे प्रश्न विचारल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
“मला नोटीस पाठवण्यामागचं कारण सभागृहात मी मांडत असलेले विषय आहेत. दाऊदसोबत सरकारच्या मंत्र्यांचं कनेक्शन किंवा विरोधी पक्षाबाबत सरकार करत असलेलं षडयंत्र हे विषय मी काढले. म्हणून अचानक अशी नोटीस मला देण्यात आली”, असाही आरोप फडणवीसांनी यावेळी केला.
राऊतांच्या ट्विटला प्रतिउत्तर
फडणवीसांच्या चौकशीआधी संजय राऊतांनी सकाळी ट्वीट करून “तुम्ही का घाबरताय?” असा अप्रत्यक्ष सवाल केला होता. त्यावर फडणवीसांनी प्रतिउत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, “मी त्यांनाच विचारतोय की मी तर मोकळेपणाने म्हटलं,, मी चौकशीसाठी तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेत राहतात. रोज केंद्रीय यंत्रणांवर आरोप करतात. मी स्वत:हून म्हटलं मी चौकशीला यायला तयार आहे. त्यांच्यात आहे का हिंमत हे बोलायची? ते रोज ‘मला का बोलावलं’ म्हणत राहतात”.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

