मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
अशी सर्व भीषण परिस्थिती असताना महाराष्ट्रातील राजकारण काही थांबात नाही आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करतायत. जरा तपासून घ्या स्वत:ला’ अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी टीकास्त्र सोडले आहे.
भाई जगताप यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. ‘केंद्र सरकार काही राजा नाही. त्यांनी सर्वांना मदत करायला हवी. आपली नैतिकता त्यांनी गुजरातला बांधलीय. गुजरातला मदत केली मग इतर राज्यांना का नाही ? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. परंतु, त्यांचा महाराष्ट्रद्वेष पाहता ते काही देतील अशी अपेक्षा नाही,परंतु महाराष्ट्र सरकारने चांगली मदत करावी, असंही भाई जगताप म्हणाले.
म्युकर मायकोसिसवरील औषधे आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्यांना विकत घेता येणार नाहीत. केंद्राकडून राज्याला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. कालपर्यंत आम्ही रक्ताचे 7 हजार युनिटस रक्तादानाद्वारे जमवले आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने ढकलण्याचे काम केले आहे. 93 देशांना आमची लस विकण्यात आली. 17 देशांतून लशीसाठी कच्चा माल येतो, त्यांना लस द्यायचा करार आहे. मग 93 देशांना का लस विकली?’ असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘केंद्रावरील आरोपांबाबत कार्यकारी संचालकांचे वक्तव्य कंपनीचे नाही’, सीरम इन्स्टिट्यूटचा खुलासा
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
- ‘राज्य सरकार आमच्यामुळे आहे, सरकारमुळे आम्ही नाही’, काँग्रेसचा सेना, राष्ट्रवादीला इशारा
- मराठा आरक्षणाअभावी शिक्षणाची संधी हुकली; धुळ्यात विद्यार्थ्याची आत्महत्या
- ठरलं तर ! ‘या’ तारखेला होणार भव्य मराठा आरक्षण मोर्चा


