🕒 1 min read
मुंबई : २०१४ नंतर काँग्रेसला राष्ट्रीय पातळीसह राज्यपातळीवर देखील उतरती कळा लागल्याचं दिसून आलं होतं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये देखील भाजपने एकहाती बहुमत मिळवून मोदी सरकार २.o चं सरकार स्थापन केलं. यानंतर, भाजपला इतर राज्यात यश मिळत असताना महाराष्ट्रात मात्र सर्वात मोठा पक्ष बनून देखील सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं होतं.
संधीचा फायदा घेत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र येत सत्ता स्थापन केली. भिन्न विचारसरणी असलेल्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याआधी काँग्रेसने काहीशी मुत्सद्दी भूमिका घेतली होती. तर, गेल्या वर्षभरात सत्तेत असून देखील दुय्यम वागणुकीमुळे नाराजी उघड केली आहे.
या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्षपद सोडण्यावर ठाम असल्याचे सद्याच्या हालचालींवरून दिसत आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याच्या बातम्या माध्यमांमधून समोर येत आहेत. काँग्रेस हायकमांडने अद्याप महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही मात्र पटोले यांच्याच नावाची जोरदार चर्चा सुरु आहे.
अशातच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ‘आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल’ असे सूचक वक्तव्य पाटोले यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. विधानसभा अध्यक्ष असणाऱ्या नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होण्याअगोदरच स्वबळावर सत्तेत येण्याचे बोलत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेल्यावर्षी यूपीएससी परीक्षांमध्ये शेवटचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना वाढीव संधी नाहीच !
- वाई न्यायालयाकडून उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा
- मराठा आरक्षणासाठी मंत्र्यांच्या जिल्ह्यात घेणार मेळावे-आ.विनायक मेटे
- तुमच्या ट्विटर अकाऊंट मध्ये होणार ‘हा’ बदल…
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
