पुणे : राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने गेले वर्षभर केवळ सत्ता टिकविण्यासाठी धडपड केली. पूर्णपणे अपयशी ठरलेल्या या सरकारमुळे राज्यातील सर्वसामान्य माणूस भरडला गेला, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुणे येथे केली.
महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षातील अपयशाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खा. गिरीश बापट, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने व भाजपा पुणे प्रभारी गणेश बीडकर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील घटकांनी सत्ता टिकविण्यासाठी वाट्टेल ते अपमान सहन केले व केवळ खुर्चीसाठी धडपड करून सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. पण कोरोनाचा मुकाबला, शेतकऱ्यांना दिलासा देणे, महिलांचे रक्षण करणे, मराठा आरक्षण वाचविणे अशा सर्वच बाबतीत हे सरकार अपयशी ठरले आणि सर्वसामान्य माणूस भरडला गेला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत दिलेल्या धमक्यांविषयी विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण किंवा मुखपत्रातील मुलाखत असो, अशी धमकीची भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कधीच वापरली नाही. ते वारंवार धमक्या देत आहेत, पण आम्ही घाबरत नाही. गेले वर्षभर आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न, दूध उत्पादकांचे प्रश्न, वाढीव वीजबिले, मंदिरे उघडणे अशा अनेक मुद्द्यांवर संघर्ष केला आहे. यापुढेही संघर्ष चालू ठेऊ, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या
- अभिमानास्पद : ऑस्ट्रेलियात फडकला छत्रपती शिवरायांचा भगवा !
- अदानी कोळसा खाणीला कर्ज दिल्यास…अमुंडीने दिला एसबीआय गुंतवणूक काढून घेण्याचा इशारा !
- ईडीच्या ‘त्या’ नोटीशीचं व साताऱ्यातील पावसाचं रुपांतर सत्तेत झालं : सुप्रिया सुळे
- भाजप नेते आ.बबनराव लोणीकरांची पोलीस अधिकाऱ्याला धमकी, कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
- कॉंग्रेसचा हात सोडणाऱ्या उर्मिला मातोंडकर उद्या बांधणार मनगटावर शिवबंधन ?


