बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामाच्या तोंडावर कंपन्यांनी खतांच्या किमतीत सुमारे ६०० ते ८०० रुपयाच्या फरकाने मोठी वाढ केली आहे. त्यामुळे सहाजिकच लागवड खर्च दुप्पट होणार असून शेतकऱ्यांचे बजेट खतांच्या भावाने बिघडले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वार्षीक सन्मान निधी देण्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे खत दरवाढीतून त्याच्या दुप्पट रक्कम शेतकऱ्यांकडून वसूल करायची हे दुटप्पी आणि फसवे धोरण केंद्र शासनाचे असून सदर वाढ कमी करण्याची आग्रही मागणी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री यांच्याकडे केली आहे.
खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे नियोजन ढासळले आहे. मागील वर्षी डीएपी बाराशे रुपये होते आता ते १९०० रुपये बॅग घ्यावे लागणार आहेत. या प्रमाणेच अन्य खतांच्या किमती देखील ७०० ते ८०० रुपयांनी वाढले आहेत. साधारणतः पाच एकर शेती असलेला अल्पभूधारक शेतकरी जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर त्याला वर्षभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक धरून १५ बॅग खत लागते. त्यामुळे एका खताच्या बॅगमागे सहाशे ते सातशे रुपये वाढले आहेत.
त्यामुळे खताच्या खरेदीसाठी दहा हजार रुपये अधिकचे शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार आहेत आणि दुसरीकडे शेतकरी सन्मान निधीच्या नावाखाली केंद्रशासन सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देते. अर्थात ते ही वेळेवर मिळत नाही. सहा हजार रुपये देण्यासाठी दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खिशातून अलगद काढण्याचा केंद्र शासनाचा दुटप्पी धोरणाचा हा प्रकार आवळा देऊन कोहळा काढल्यासारखाच आहे.
शेतकऱ्यांमध्ये खत दरवाढीवर प्रचंड असंतोष आहे. कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना ही खत दरवाढ परवडणारी नाही. मागच्या वर्षी नापिकीचे संकट होते. अतिवृष्टीने हाल केले. लॉकडाऊन मध्ये फळ पीक, भाजीपाला यांचेही नुकसान झाले आहे. उरलं सुरलं वादळाने देखील थैमान घालून फळ पिकांची नासाडी केली, अशा प्रसंगी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी खत दरवाढीचा बोजा त्यांच्यावर लादून काय साध्य केले असा प्रश्न देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.
ही शेतकऱ्यांची लूट असून त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषिमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालून खतांची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी पत्राद्वारे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल’, आ. राणाजगजितसिंह यांची माहिती
- आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये खर्च करण्याऐवजी हा पैसा सामान्यांसाठी वापरा : करुणा मुंडे
- बोगस ‘ई-पास’ बनवणाऱ्या तिघांना अटक; उस्मानाबाद पोलिसांची कारवाई
- ‘लसीकरण पूर्ण झाल्यावर आपण कोरोनाची तिसरी लाट नक्की रोखू शकू’, सुप्रिया सुळे यांचे मत
- वीरु धावला कोरोनापीडीतांसाठी, सुरु केली ‘राहत की सास’; गरजुंना मिळणार मोफत ऑक्सिजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

