मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. वाझे यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझेंकडून या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, ठाणे सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांचा अंतरिम जामीन नाकारला यामुळे सचिन वाझे यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना आता अटक करण्यात आली आहे. काल रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे.
एनआयएच्या विशेष न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीला विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच धारेवर धरले असल्याचे चित्र दिसत आहे. एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलीय.
उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? असा प्रश्न पाटील यांनी सरकारला विचारला आहे. तसेच ‘आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो, परंतु इथं उद्योगपतींच्या घातपाताची आणि समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचं समर्थन शिवसेना करत होती, अशी टिकाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
‘मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचं समर्थन का केलं जात होतं? असा सवाल करतानाच नक्की कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले?’ असंही पाटील यांनी विचारलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तान्हुल्यांना रक्तबंबाळ आईच्या मृतदेहापाशी सोडून पाळणारा नराधम बाप अटकेत
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

