औरंगाबाद: शहरातून संकलित होणार्या कचर्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठी चिकलठाणा आणि पडेगाव येथील १५० मेट्रीक टन क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. हे प्रकल्प सध्य ८ तास चालविले जात आहेत. तरी संबंधित कंत्राटदार मायोवेसल्स कंपनीला कचर्याचे ढीग संपवण्यात अपयश येत आहे. त्यामुळे आता दोन्ही प्रकल्प १६ तास चालविण्याची सूचना केली आहे, अशी माहिती पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.
शहरापासून काही अंतरावर चिकलठाणा आणि पडेगाव येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाले आहेत. येथे दररोज १५० मेट्रीक टन कचर्यावर प्रक्रिया केली जात आहे. मात्र येथे असलेले कचर्याचे ढीग संपविण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने आता नियोजन सुरु केले आहे. चिकलठाणा आणि पडेगाव प्रकल्पाच्या ठिकाणी कचर्याचे ढीग नव्हे तर डोंगर झाले आहेत. अनेक दिवसापासून हा कचरा तसाच पडून आहे. शहरात दररोज साधारणपणे ३३० ते ३८० मेट्रीक टन कचरा जमा होत आहे. त्यापैकी साधारणपणे दिडशे ते दोनशे टन कचर्यावर रोज प्रक्रिया होत आहे. मात्र या दोन्ही केंद्रांवर साचलेल्या कचर्याचे ढीग तसेच असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या कचर्यावरही प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने दोन्ही प्रकल्प १६ तास चालविण्यात यावेत, अशी सूचना प्रशासकांनी केली.
कंत्राटदारास देणार प्रोत्साहन भत्ता
कचरा प्रक्रिया प्रकल्पातील मशिनरी आठ तासच चालविण्यात येतील, असे करारामध्ये नमुद केले आहे. आठ तासापेक्षा अधिक मशीन सुरु ठेवल्यास त्यांचा घसारा लवकर होऊन मशिनरी खराब होण्याचा धोका आहे, असे कंत्राटदारांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर आयुक्तांनी दोन्ही प्रकल्पाच्या कंत्राटदारांना रोज प्रकल्पामध्ये 200 पेक्षा अधिक मेट्रीक टन कचर्यावर प्रक्रिया केल्यास त्याबदल्यात विशेष प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
स्क्रिनिंग, बेलिंग, श्रेडींग पुन्हा सुरू करणार
चिकलठाणा आणि हर्सुल या ठिकाणी प्रकल्प सूरू होण्यापूर्वी १६ टन क्षमतेच्या स्क्रिनिंग, बेलिंग, श्रेडींग या कचर्यावर प्रक्रिया करणार्या मशीन बसवलेल्या आहेत. मात्र या मशीन सध्या बंद पडल्यामुळे कचर्यावर प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे आता दोन्ही ठिकाणच्या मशिनरी सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे आयुक्त पांडेय यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
- एस.टी.बसच्या धडकेत दिव्यांग प्रवासी जखमी
- केंद्र सरकार कृषी कायद्याच्या भूमिकेवर ठाम, मोदींचा पुनुरुच्चार
- मनपाच्या नागरी मित्र पथकाने केली ७६ लाखांवर वसुली
- ब्रेकिंग न्यूज : संजय राऊत आंदोलनस्थळी जाऊन शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता
- निवडणूक बिनविरोध करत ‘वृद्धेश्वर’ सहकारी कारखान्यावर पुन्हा राजळेंची सत्ता


