🕒 1 min read
नाशिक : काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ४० टक्के तिकीट महिलांना देणार असल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता भाजपनेही महिलांच्या बाजूने धोरण राबवत एक निर्णय घेतला आहे. मनपा निवडणुकीत यंदा नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने या वाढीव संख्येत युवा मोर्चा व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी ५० टक्के उमेदवारी देण्यात येईल, अशी घोषणाच भाजपचे प्रभारी तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.
भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. यावेळी रावल म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमुळे राज्याची वाताहत झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून सरकारविरोधातील राग व्यक्त करण्याची संधी आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागून दिवाळीत फटाके उडविण्यासाठी सज्ज व्हावे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक संपर्कात असल्याचे शिवसेनेकडून वारंवार सांगितले जाते. यावरून शिवसेना आयातांवरच दिवस काढणार का? असा सवालही रावल यांनी केला.
राज्य सरकारने दोन वर्षांत महापालिकेला सापत्नतेची वागणूक दिली असून कुठलाही नवीन प्रकल्प अथवा निधी दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला. याउलट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला मेट्रो प्रकल्प तर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकासासाठी भरघोस निधी दिल्याचेही रावल यांनी सांगितले.
मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपच्या रूपाने देशात सर्वात मोठे संघटन उभे राहिले आहे. संघटनांच्या माध्यमातून देशभरात भाजपने सत्ता स्थापन केली. मोदी सरकारमुळे देशात सर्व संकल्प पूर्ण होण्याचा सुवर्णकाळ सुरू आहे. कोरोनाकाळात कार्यकर्त्यांनी जनतेची सेवा केली. काँग्रेसने सत्ताकाळात गरिबांच्या भावनांशी खेळ केला. पंतप्रधान मोदींनी गरिबीचे भांडवल माेडीत काढत गरिबी हटविण्यासाठी अंत्योदय योजनेचा नारा दिला. स्थानिक स्वराज्य संस्था ताकदीने लढायच्या आहे. विरोधकांना कमजोर समजू नका. परिवार म्हणून वज्रमूठ करून निवडणुकांना सामोरे जायचे आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
- मलिक पुन्हा करणार एक गौप्यस्फोट, ‘मिलते है रविवार को’ म्हणत दिला इशारा!
- राज ‘का’ कारण! सहानुभूतीची लाट आणि एकजुटीमुळेच देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय
- राजकारणात २५-३० वर्षांपूर्वी आम्हीही नको ती अंडी उबवली; मुख्यमंत्र्यांचा जुन्या युतीवरून भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
