बीड: जिल्ह्यात वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना सध्या स्थानिक प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत. तसेच लसीकरणाची मोहीम देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे. तसेच ‘मिशन झीरो डेथ’ या अभियाना अंतर्गत गावा – गावात जाऊन नागरिकांची चाचणी करून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही आता कोरोनाचा शिरकाव होत असल्याने अनेक गावातील गावकऱ्यांनी या महासंकटावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवायला सुरू केले आहे. तसेच अनेक गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जनता कर्फ्यू देखील जाहीर केला आहे. तसंच आडस या गावात देखील गावकऱ्यांनी दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे.
केज तालुक्यातील आडस येथे गेल्या काही दिवसांपासून दररोज दहा ते बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून येतं आहेत. या महिनाभरात कोरोना बाधितांचा आकडा २०० पार गेला आहे. हे चित्र पहाता गावात मोठा संसर्ग वाढला असल्याने चिंतेच वातावरण आहे. संसर्ग रोखण्यासाठी याची साखळी तोडणे आवश्यक आहे. यासाठी शुक्रवारी दि. २३ रोजी रमेश आडसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आडस येथे एक बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्वानुमते गावात १० दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
या दहा दिवसात लोकांना काही अडचण येऊ नये म्हणून सोमवारी सकाळी ११ पर्यंत किराणा आणि भाजीपाला मिळेल. त्याच दिवशी १० दिवस पुरेल अशी खरेदी करण्यात यावी. यानंतर आठ दिवस किराणा, भाजीपाला सर्व बंद रहाणार आहे. शेतात कामाला जाणाऱ्यां व्यतिरिक्त विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ठरलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाला कोरोना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी १० दिवस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.
आडस येथील वाढते कोरोना रूग्ण आणि केज, अंबाजोगाई येथील वाढती गर्दी पहाता येथेच ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करावे त्याचे सर्व नियोजन करण्याची हमी भाजपा नेते रमेश आडसकर यांनी दिली. तालुका प्रशासनाकडे याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत तहसीलदार यांनी याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविले आहे. त्यास मंजुरी येताच दोन दिवसात कोविड सेंटर सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- दुचाकीवर दारूची वाहतूक करणारे दोघे जेरबंद
- विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५० हजाराचा दंड वसूल
- परळीत ५० बेडचे कोविड केंद्र सुरू
- सुजय विखेंनी आणलेल्या ‘त्या’ बॉक्समध्ये काय होते, रुपाली चाकणकरांनी उपस्थित केली शंका
- महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार


