नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाबाबत राजकीय खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच राजधानी दिल्लीत दाखल झालेले एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या बैठकांना त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ स्थापनेसंदर्भात या बैठका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. शिंदे आणि फडणवीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. त्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सराकर स्थापन झाल्यानंतर आम्ही वरीष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेत आहेत. आम्ही उपराष्ट्रपतीजी यांची सुद्धा वेळ मागितली होती. ते सध्या कर्नाटक दौर्यावर असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. मात्र त्यांनी दूरध्वनीवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पुढच्या काळात निश्चितपणे वेळ देण्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे.”
उपमुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला माझ्या पक्षाने मोठे केले. त्यांनी मुख्यमंत्रीपदापर्यंत मला संधी दिली. माझ्यासाठी पक्षाचा आदेश हा नेहमीच महत्त्वाचा होता, आहे आणि राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार यशस्वी व्हावे, हाच आमचा प्रयत्न राहणार आहे.”
खरी शिवसेना ही हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि त्याच शिवसेनेसोबत आम्ही युती केल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली का?, यावर फडणवीस म्हणाले, “दिल्ली दौर्यात खातेवाटप किंवा तत्सम विषयांवर कोणतीही चर्चा झालेली नाही. आषाढी एकादशीची पूजा आटोपल्यानंतर मुख्यमंत्री मुंबईत आले की यासंदर्भात आम्ही एकत्रित बसून चर्चा करू.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

