🕒 1 min read
औरंगाबाद : शहरातील केवळ २५ टक्के रुग्णालयांनी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत असल्याची कागदपत्रे सादर करून फायर एनओसी घेतली आहे. तर उर्वरित ७५ टक्के रुग्णालयांचे फायर ऑडिट झालेले नसल्याचे गतवर्षीच्या प्राप्त अहवालातून समोर आले आहे. मनपाच्या अग्निशमन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या रुग्णालयांची सुरक्षा रामभरोसेच आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फायर एनओसी न घेतलेल्या रुग्णालयांना मनपा लवकरच नोटिस बजावण्याच्या तयारीत आहे. मात्र यांचे ऑडिट करण्यास तसेच थेट कारवाई करण्यात मनपा कुचराई करत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने राज्यातील सर्व बाल रुग्णालयांचे स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील रुग्णालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयांमधील अग्निरोधक यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, याची तपासणी अग्निशमन विभागाला करावी लागणार आहे.
दोन वर्षापूर्वी शहरातील माणिक हॉस्पिटलला देखील अशीच आग लागली होती. सुदैवाने त्यावेळी जीवितहानी झाली नव्हती, परंतु रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, मनपाच्या अपुऱ्या यंत्रणेमुळे अद्यापही अनेक रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
फायर एनओसी नसलेल्या रुग्णालयांना नोटीस बजावणार
ज्या रुग्णालयांमध्ये पन्नासपेक्षा जास्त बेड्स आहेत अशा रुग्णालयांना फायर एनओसी ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा रुग्णालयांची यादी बनवणे सुरु आहे. सदर रुग्णालयांना लवकरात लवकर नोटीसा बजावण्यात येणार आहेत.
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
